मृत व्यक्तींच्या नावे घरकुल मंजूर करून लाखोंची लुट 

मृत व्यक्तींच्या नावे घरकुल मंजूर करून लाखोंची लुट 

संग्रामपूर (बुलढाणा) : दिवाळी पूर्वी घरकुल योजनेत शासनाला लाखो रुपयांचा चुना लावून पंचायत समिती मधील ऑपरेटर पदावर असलेल्या व्यक्तीने स्वतःची दिवाळी साजरी करून घेतल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. ह्या संदर्भात 30 ऑक्टोबर ला येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सचिव आणि पदाधिकारी यांनी लेखी तक्रार अर्ज देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

तालुक्यातील कोलद येथील प्रपत्र ब मध्ये नाव नसताना आणि प्रपत्र ब मध्ये असलेल्या नावाची व्यक्ती मयत असताना असे दोन घरकुलाची पूर्ण रक्कम काम पूर्ण झाले नसताना काढून शासनाची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. मोडाबाई फकिरा बोदडे हे नाव प्रपत्र ब मध्ये आहे. परंतु ही व्यक्ती मयत आहे. तर अनिल रामदास नृपनारायन हे नाव प्रपत्र ब मध्ये नाही. या दोन्ही नावाने घरकुलाची पूर्ण रक्कम बँका मधुन काढण्यात आली. या बाबतचे कुठलेही रेकॉर्ड ग्रामपंचायत व पंचायत समिती उपलब्ध नाही. सोबतच घरकुलाचे काम ही पूर्ण झालेले नाही. असे असताना आणि लाभार्थी मयत असताना रक्कम कशी काढण्यात आली. असा प्रश्न निर्माण होत असून संबंधित बँक आणि घरकुलाचे कामकाज पाहणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

गावात हा प्रकार माहीत पडताच ग्रामपंचायत प्रशासनाने सावध पवित्रा घेत पंचायत समितीकडे या बाबतीत तक्रार देऊन प्रकार उजेडात  आणला आहे. आता पंचायत समिती कडून या गंभीर बाबीची तपासणी होऊन दोषी विरुद्ध कार्यवाही करण्याचे आव्हान आहे. ज्या व्यक्तीने हे सर्व घडवून आणून शासनासह ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाची दिशाभूल केली. आणि दोन घरकुलाची लाखो रुपयांची रक्कम काढली ती व्यक्ती या अगोदर ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. आता पंचायत समितीला त्याच विभागात कार्यरत आहे. म्हणजेच अधिकाराचा दुरुपयोग करून दिवाळी पूर्वी शासनाचे दिवाळे काढण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. पाच हप्ते काढले जात असताना याकडे कुणीही लक्ष देऊ नये हा पण संशोधनाचा विषय बनला आहे. 

डी सी मुळे होते घात... 
या मध्ये घरकुल च्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी गटविकास अधिकारी यांची डिजिटल स्वाक्षरी (डीसी)  असलेली डीसी चा अवलंब केला जातो. ही डीसी तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी संबंधित व्यक्तीकडे दिल्याने असा दुरुपयोग झाल्याची पंचायत समिती कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहे. 

घरकुल निवडी पासून तर हप्त्याची रक्कम काढण्यापर्यंत ह्या पंचायत समिती मध्ये फिल्डींग लावली जात असल्याची बोंब आहे. काही गावातून तशा तक्रारी ही झालेल्या आहेत. ऐवढे सर्व होत असताना संबधीत अधिकाऱ्यांनी घरकुल बाबत गांभीर्य दाखविण्याची तसदी घेतली नाही. म्हणून हा प्रशासनाच्या बेजबाबदार पणाचा नमुना समोर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून पंचायत समितीच्या विरोधात अशी गंभीर स्वरूपाची तक्रार होण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल! तक्रार अर्जावर सरंपच अर्चना तायडे, सचिव पी एन चाटे, उपसरपंच दिनेश धुरदव यांच्यासह सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com