Gram Panchayat Results : गडचिरोलीतील बहुतांश ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचं वर्चस्व 

MahaVikas aaghadi wons most seats in Gadchiroli Gram panchyat elections
MahaVikas aaghadi wons most seats in Gadchiroli Gram panchyat elections

गडचिरोली : जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला असून ३२० ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे.

१५ आणि २० जानेवारी अशा दोन टप्प्यांत जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. शुक्रवारी बाराही तालुक्‍यांतील निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली. यातील बहुतांश ग्रामपांयतींचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक ग्रामपंचायतींवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

गडचिरोली तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, साखरा ग्रामपंचायतीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने ९ पैकी सहा जागा जिंकल्या आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रातील बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिंकल्या असून आदिवासी विद्यार्थी संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्याचा दावा आघाडीने नेते करीत आहेत.

दुसरीकडे आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजपनेच सर्वाधिक जागा जिंकल्या असून जिल्ह्यात १८० अधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केला आहे.

नक्षलवाद्यांची सावध भूमिका...

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नक्षलवाद्यांनी अगदीच सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एरवी ग्रामपंचायतींवर प्रभाव टाकू बघणाऱ्या नक्षल्यांनी यंदा या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कुठेच आपले अस्तित्व दाखवले नाही. त्यामुळे कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आदी नक्षलदृष्ट्या संवेदनशील गावांतही निवडणूक निर्धास्त पार पडली. यापूर्वी अनेकदा नक्षलवाद्यांच्या धमक्‍यांमुळे अतिदुर्गम गावांत निवडणुकीसाठी उमेदवारच मिळत नव्हते. पण, त्यामुळे नेतृत्वहीन ग्रामपंचायती प्रशासकांच्या अधिकारात जाऊन विकास रखडत होता. त्यामुळेही लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता. लोकक्षोभ पुढे अंगलट येईल, या भीतीमुळे यंदा नक्षलवादी शांत राहिले, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.

संपादन -अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com