नागपूर - 'देशाच्या काही राज्यांमध्ये पाण्याची मुबलकता असली, तरी त्याच्या वापरासंबंधी कोणतेच नियोजन नाही. त्यामुळेच वर्षातील काही दिवस अशा राज्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. त्यासाठी पाणी साठविण्याचे पर्याय निर्माण करणे, तसेच उपलब्ध जलस्त्रोतांचे बळकटीकरणाकरिताचा प्रकल्प हाती घेण्यात येतील. "अटल भूजल' योजनेची अंमलबजावणी त्याकरिता होईल,'' असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.
"भूजल मंथन' या राज्यव्यापी पाणी परिषदेचे उद्घाटन आज झाले. परिषदेच्या अध्यक्षपदावरून गडकरी बोलत होते. केंद्रीय जलसंधारण राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय भूजल मंडळाचे अध्यक्ष के. सी. नाईक, केंद्रीय जलसंधारण सचिव यू. पी. सिंह, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आदी या वेळी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ""अटल भूजल योजना लोकसहभागातून राबविली जाणार आहे. सहा हजार कोटींच्या या योजनेसाठी तीन हजार कोटी रुपये जागतिक बॅंकेचे, तर उर्वरित निधी केंद्र सरकारचा आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी होईल. याद्वारे जलस्त्रोतांचे बळकटीकरणाचा उद्देश साधला जाणार आहे.''
...तर थांबतील आत्महत्या
विदर्भात या वर्षी दहा हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे गडकरी म्हणाले. शेतात उत्पादकता आणि ग्रामीण भागात रोजगारासाठी पाणी उपलब्धतेची गरज आहे. त्याशिवाय हे दृष्टचक्र थांबणार नाही. गोसीखुर्द प्रकल्प 384 कोटींचा होता, आता त्याची किंमत साडेअठरा हजार कोटींवर पोचली आहे. प्रकल्पाच्या पूर्णत्वाकरिता निर्णय घेणे गरजेचे आहे.
गडकरी म्हणाले...
- राष्ट्रीय महामार्गावर 100 पूलवजा बंधारे बांधणार.
- या मध्यमातून सुमारे 45 ते 50 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
- पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल
- खडकवासला धरणातून 20 लाख ट्रक गाळ काढला
- 96 प्रदेशांत भूजल पातळी वाढली
- नऊ लाख विहिरीसांठी 40 हजार कोटींची योजना
|