नागपूर - काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असल्याचा पुनरुच्चार करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारत अखंड देश असून, सर्वांचा "डीएनए' एकच असल्याचे सांगितले.
जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्रातर्फे आयोजित "सप्तसिंधू' या जम्मू-काश्मीर लडाख महाउत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले, की काश्मीरमध्ये जी समस्या आहे, तीच संपूर्ण देशभर आहे. ही समस्या बाहेरून निर्माण झालेली नसून, आतूनच आलेली आहे. याचे मूळ कारण म्हणजे आज आपण आपली एकता विसरत आहोत. त्यामुळे दुरावा निर्माण होत असून, स्वार्थाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे देश तुकड्या-तुकड्यांमध्ये वाटला जात आहे. तेव्हा आपल्यामधील एकात्मतेचा भाव जागृत करून त्याचा प्रचार-प्रसार केल्यास जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविता येणे शक्य होईल. जम्मू-काश्मीर आणि लडाखचा इतिहास मोठा आहे. त्या इतिहासात देशातील संस्कृतीचा वास आहे. ती संस्कृती वाचविण्यासाठी सरकारकडून मदत होत आहे. मात्र, काही लोक त्यात कुरापती करीत आहेत. त्यांना दुसऱ्या भाषेत उत्तर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
|