कारंजा (लाड)
कारंजा-मानोरा विधानसभेचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी मुंबई येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राणज्योत मावळली. गत काही महिन्यांपासून ते आजाराने ग्रस्त होते. विद्यमान आमदार यांच्या निधनाने मतदार संघावर शोककळा पसरली आहे.
आमदार पाटणी यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतल्यास कुठलाही राजकीय वसा नसतांना एका व्यावसायिक कुटुंबातील व्यक्ती म्हणुन त्यांची ओळख होती. मात्र, हस्तरेखाचा मेळ काही वेगळाच खेळ खेळणार होता. त्यातूनच कि काय पाटणी यांची तत्कालीन दिवंगत माजी मंत्री तथा बालाजी साखर कारखानाचे अध्यक्ष बाबासाहेब धाबेकर यांच्याशी जवळीक साधल्या गेली. त्यावेळी, 1995 ते 1999 पर्यंत राज्यात युतीचे सरकार होते.
mla rajendra patni passed away political journey karanja lad vidhansabha bjp shivsena
तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा दौरा असतांना त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पाटणी यांनी चोखपणे बजावली. आगामी निवडणूक लक्षात घेता अकोला-बुलढाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेची शिवसेनेची उमेद्वारी पाटणी यांना मिळाली. या मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्गज प्रतिस्पर्धी अनंतराव देशमुख यांचा पराभव करुन विजयी झाले.
या राजकारणाच्या पटलावर त्यांना अनेक चढ-उतार आले. मात्र, या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आशेचा किरण दैदीप्यमान करुन न डगमगता त्यावर मात केली. विधान परिषदेच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व करत असतांना 1996-2002 या सहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी विकास कामाला चालना दिली. शिवाय, वाशीम जिल्हा निर्मितीसाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला होता.
सुरुवातीपासूनच आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांना विधानपरिषदे पेक्षा विधानसभा मध्येच रुची होती. त्याच वाटेवर चालतांना त्यांनी मतदार संघात दांडगा संपर्क प्रस्थापित केला. विधानपरिषदेचा कार्यकाळ संपताच त्यांना 2004 ची शिवसेनेद्वारे उमेद्वारी मिळाली. या निवडणुकीत त्यांचे एकेकाळीचे निकटवर्तीय बाबासाहेब धाबेकर हे प्रतिस्पर्धी होते. त्यांच्यावर कुरघोडी करुन त्यांनी विजयश्री खेचून आणून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकावला.
तर, 2009 च्या विधानसभा निवडणूकमध्ये पक्षांतर्गत कलहमुळे, स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या विरुद्ध बंड पुकारल्याने त्यांचा पराभव होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके हे निवडून आले. या पराभवाला एकवटून न ठेवता त्यांनी आपल्या कार्याला सुरुच ठेवले उल्लेखनीय म्हणजे, ज्या क्षेत्रामधून त्यांना मतदान मिळाले नाही. त्या क्षेत्रातील मतदारांची कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रकर्षाने लक्ष केंद्रित केले.
तद्नंतर, 2014 च्या कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाची उमेद्वारी शिवसेनेकडून पाटणी यांना मिळाली नाही. त्यामुळे, त्यांनी भाजपात प्रवेश करुन भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवली. शिवाय, मोदी लाट सुद्धा या काळात मुसंडी मारत असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर ठरला. शिवाय, 2019 च्या निवडणुकीच्या भाजप उमेद्वारीची माळ पाटणी यांच्या गळी पडली आणि ते तब्बल 23000 हजार मताच्या फरकाने निवडून येऊन त्यांना 73205 मते मिळाली होती.
अशातच, त्यांनी आपल्या मृदु स्वभावाची चुणूक दाखवत भाजप मधील महत्वाच्या नेतेमंडळींना आपलेसे केले. त्याचाच प्रत्यय म्हणुन देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय म्हणुन मध्यंतरीच्या काळात ओळखल्या जात होते. असा, अभ्यासू, हरहुन्नरी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेल्याने मतदार संघाची मोठी हानी झाली आहे. शिवाय, २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पाटणी यांच्या जाण्याची दाहकतेची झळ भाजपाला पोहचणार हे तितकेच खरे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.