नितीन गडकरी
नितीन गडकरी

मोदी सरकारचे "ऑडिट' कराच

नागपूर : कॉंग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात झाली नाही, तेवढी कामे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने पाच वर्षांत गरिबांसाठी करून दाखविली आहेत. या कामांचे कुणीही सोशो-इकोनॉमिक ऑडिट करावे, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना जाहीर आव्हान दिले. या वेळी त्यांनी विकासकामांमुळे सामाजिक, आर्थिक विषमता दूर होत असल्याने सर्व विरोधक एकत्र आल्याची टीकाही केली.
भारतीय जनता पक्ष, अनुसूचित जाती मोर्चातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या प्रांगणात आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्‌घाटन शनिवारी झाले. या सोहळ्यात गडकरी बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री राम माधव, दुष्यंत गौतम, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, मोर्चा प्रभारी खा. भूपेंद्र यादव, महामंत्री चि. न्ना. रामो, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी आदी उपस्थित होते.
गडकरींनी देशाला सुखी, संपन्न, सामर्थ्यशाली, जगातील सर्वांत मोठी शक्ती बनविणे भाजपचे मिशन असल्याचे सांगितले. सामाजिक, आर्थिक परिवर्तन भाजपच्या विचारांचा भाग आहे. राष्ट्रवाद, सुशासन आणि विकास, सामाजिक-आर्थिक चिंतन या तीन विचारांवर केंद्र सरकार देशाला पुढे नेत आहे. देश बदलत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित देशभरातील स्थानांवर स्मारकांच्या विकासाचे कार्य करीत सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
थावरचंद गहलोत यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार डॉ. आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे कार्य करीत असल्याचे सांगितले. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीयांना अनेक योजनांच्या माध्यमातून सामाजिक सन्मान प्रदान करण्याचे कार्य केले जात आहे. त्यातून सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक विषमता दूर होत आहे. हे कार्य बघून विस्तवही न जाणारे पक्ष एकत्र येत आहेत. कॉंग्रेस पक्ष तर देशविरोधी नारे लावणाऱ्यांचेही समर्थन करीत असल्याची टीका त्यांनी केली. विनोद सोनकर यांनीही "अब की बार फिर मोदी सरकार'चा नारा बुलंद केला.  
विरोधकांच्या आघाडीला धूळ चारू
नितीन गडकरी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. सरकारचे काम बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. यातूनच ते एकत्र येत आहेत. भाजपच विरोधकांचा किंगमेकर ठरला. आम्ही नसतो तर भांजा बुआकडे गेला नसता, अशी कोटी करीत अखिलेश व मायावतींच्या आघाडीवर निशाणा साधला. "सब एक हो जाऊ, तरी सर्वांना धूळ चारूच', असा इशारा त्यांनी दिला. येणाऱ्या निवडणुकीत भाजप पुन्हा बहुमताने सत्ता मिळवेल आणि मोदींच्या नेतृत्वात सरकार आणू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com