सौदीत अडकले तीनशेपेक्षा अधिक भारतीय; अशी आहे तेथील परिस्थिती

corona.jpg
corona.jpg

अकोला : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाउनचे पाउल उचलले आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय विमान सेवाही ठप्प झाली. त्यामुळे भारतातील विविध राज्यातील सुमारे 300 पेक्षा अधिक नागरिक सौदी अरेबियाच्या विविध भागात अडकले आहेत. त्यामध्ये जेद्दाह येथे यवतमाळच्या सचिन ढोकणे यांचा समावेश आहे. येथून लवकरात लवकर आपली सुटका करावी यासाठी ढोकणे यांच्यासह भारतीय नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीचे साकडे घातले आहे.

नोकरी, व्यापार, पर्यटनासह अन्य कामासाठी भारतातील तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात यासह विविध राज्यातील भारतीय हे 24 फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियात गेलेले आहेत. ते 23 मार्च रोजी भारतात परत येणार होते. मात्र, जगातील कोरोना विषाणूचे थैमान वाढल्याने बहूतांश राष्ट्रांनी लॉकडाउनचे पाउल उचलले आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय विमान सेवाही ठप्प झाली आहे.

त्यामुळे त्यांचे तिकीट रद्द झाल्याने सुमारे 300 पेक्षा अधिक भारतीय हे सौदी अरेबियात अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ येथील सचिन साहेबराव ढोकणे यांचा समावेश आहे. तो सध्या जेद्दाह येथे आहेत. त्यांचा व्हिसाही संपला. सचिनसह भारतात परत येऊ पाहणाऱ्या सुमारे 120 नागरिकांनी व्हॉट्सॲपवर एक समूह तयार केला आहे. या समुहाच्या माध्यमातून ते नियमित संवाद करतात. येणाऱ्या अडचणीही शेअर करीत धीर देत आहेत.

यात ज्येष्ठ नागरिकही आहेत. त्यांचे औषध संपल्याने त्यांना असाह्य त्रास होत आहे. त्यांच्याकडून मायदेशी परत येण्यासाठी भारतीय दुतावासाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यांच्याडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अजून यासंदर्भात निर्णय व्हायचा आहे. जिथे आहे तिथेच सुखरुप राहा, असे सांगितले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयालाही त्यांच्याकडून इ-मेल पाठवून मदत मागितली जात आहे.

औषध संपल्याने त्यांना असाह्य त्रास
माझा व्हिसा हा 15 एप्रिलला संपला आहे. आम्हाला भारतात परत यायचे आहे. यासाठी भारतीय दुतावास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क केला जात आहे. इथे काही ज्येष्ठ नागरिकही आहेत. त्यांच्या औषध संपल्याने त्यांना असाह्य त्रास होत आहे.
-सचिन ढोकणे, यवतमाळ, महाराष्ट्र (सध्या जेद्दाह येथे वास्तव्यास आहे)

केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल
विविध राज्यात अडकलेले कामगार, विद्यार्थी यांना पास देण्यात येईल. त्यांची तपासणी करूनच त्यांना स्वतःच्या राज्यात आणण्यात येत आहे. विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संपर्क करू.
-बच्चू कडू, राज्यमंत्री, महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com