लोकशाहीसाठी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या इशाऱ्यांचे विस्मरण - अन्सारी

लोकशाहीसाठी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या इशाऱ्यांचे विस्मरण - अन्सारी

नागपूर - राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजेला झुकते माप दिल्यास देशाची अधःपतनाकडे वाटचाल सुरू होऊन; तो हमखास हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग ठरेल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. लोकशाही रुजविण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्यांचे आता विस्मरण झाले आहे, असे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज येथे सांगितले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या "महाराष्ट्रातील गरिबी व असमानता आणि अस्पृश्‍यता', तसेच "सामाजिक भेदभाव व अत्याचार' याविषयीच्या अहवालाचे अन्सारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई उपस्थित होते.

डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचे संदर्भ देत अन्सारी यांनी सध्याच्या वास्तवावर बोट ठेवले. ते म्हणाले, 'सामाजिक व आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी घटनाबाह्य पद्धतीचा त्याग करणे आवश्‍यक आहे. जोपर्यंत सरकारची धोरणे आणि व्यवहार निधर्मी राहात नाहीत, तोपर्यंत घटनेत असलेल्या सामाजिक, आर्थिक समानतेचे ध्येय साध्य होऊ शकत नाही. सरकार निधर्मीपणे कार्यरत राहण्यास अपयशी ठरले तर घटनेचे सामाजिक, आर्थिक समानतेचे उद्दिष्ट साध्य होत नाही.''

महाराष्ट्रात 1993 मध्ये 49 टक्के असलेले दारिद्य्र 2012 मध्ये 17 टक्‍के कमी झाले. साक्षरतेचे प्रमाण 65 टक्‍क्‍यांवरून 82 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. वीज, पाणी आणि स्वच्छतेमध्ये विकास होत आहे. परंतु, आकडेवारीनुसार हा विकास विषम स्वरूपात होताना दिसत असल्याचे स्पष्ट होते. दलित आणि मुस्लिम यांच्या विकासातही विषमता दिसत असून, सामाजिक न्याय आणि सामाजिक शांततेची गरज आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र दुसरा असला तरी गरिबीत सहाव्या क्रमांकावर आहे. कुपोषणात राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचे अन्सारी यांनी निदर्शनास आणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com