मॉन्सूनच्या मर्जीवर भागणार नागपूरकरांची तहान

file photo
file photo

नागपूर : शहराला स्मार्ट करताना नागरिकांची तहान कशी भागणार याचा विचारच आजवर करण्यात आला नसल्याने यंदा धरणातील मृत साठा वापरण्याची पाळी ओढावली आहे. मध्य प्रदेश सरकार पेंच नदीवर धरण बांधत असल्याचे ठाऊक असतानाही महापालिकेने तातडीने नियोजन केले नाही. त्यामुळे यापुढे मॉन्सूनच्या भरोशावरच शहराची तहान भागणार असून वारंवार टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी सर्वच महापालिकांनी स्वतःचे धरण बांधले आहे. नागपूर त्यास अपवाद आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या तोतलाडोह धरणाचे पाणी घेतले. गरज भागताच मनपाचे भविष्यातील पाण्याचा विचारच सोडून दिला. मागील 20 वर्षांपासून महापालिकेने पाण्याची कधीच चिंता केली नाही. भविष्याच्या दिशेने नियोजन केले नाही. आता मध्य प्रदेशने पेंच नदीवर धरण बांधले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तोतलाडोहचा साठा आटला आहे. त्यातच दोन वर्षांपासून नागपूर आणि मध्य प्रदेशातही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भीषण परिस्थिती उद्भवली. तोतलाडोहचे पाणी कोणाचे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील सिंचनाच्या सोयीसाठी हे धरण बांधण्यात आले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात पाण्यासाठी शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष उद्‌भवण्याची शक्‍यता आहे.
आडातच नाही...
कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याऐवजी महापालिकेने आजवर वितरणावरच अधिक भर दिला. याकरिता नवेगाव ते महादुला अशी लोखंडी जलवाहिनी टाकली. त्यामुळे गळती बंद झाली. बाष्पीकरणामुळे उडून जाणारे पाणी वाचले. मात्र, धरणातच पाणी नसल्याने आता त्याची उपयोगिता संपत चालली आहे.
चोवीस तासासाठी पाणी कुठून येणार?
पाण्याची चोरी, गळती व शुद्ध पाण्यासाठी शहरात चोवीस बाय सात प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलविल्या जात आहेत. सुमारे साडेसातशे किलोमीटर लांबीच्या अंतर्गत वाहिन्या बदलवण्यात आल्या. 676 किलोमीटरपैकी सुमारे 600 किलोमीटरच्या मोठ्या वाहिन्या बदलवण्यात आल्या आहेत. साडेतीन लाख मीटर बदलवायचे आहेत. आतापर्यंत पावणेदोन लाख कनेक्‍शन बदलण्यात आले. याकरिता भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे चोरी व गळतीचे पाणी वाचणार आहे. चोवीस तास पाणी मिळाल्यास साठा करून ठेवला जाणार नाही असा तर्क लावला जात आहे. योजना चांगली असली तरी त्याकरिता चोवीस तास आणायचे कुठून असा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com