क्या बात है! अमिताभने तयार केले खराब लसणापासून कीटकनाशक; यशस्वी प्रयोगाचे शिल्पकार

amitabh meshram made fertilizers from Rotten garlic
amitabh meshram made fertilizers from Rotten garlic

नागपूर : उन्हाळ्यात लग्नसमारंभामुळे लसणाच्या उद्योगाला भरारी येईल, अशी शक्यता लक्षात घेता अमिताभ मेश्राम यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची खरेदी केली. कोरोना महामारीमुळे देशभरात टाळेबंदी झाल्याने व्यवसाय ठप्प झाला. १५ लाखाचा खरेदी केलेला लसण खराब होऊ लागल्याने त्याचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. लसणापासून कीटकनाशक तयार करण्याचा विचार मनात आला. विद्यमान बाजारात असलेल्या सेंद्रिय खतांचा उत्पादनाचा अभ्यास करून संशोधन आणि विकास केला. त्यातूनच पाण्याचा अंश असलेले पहिले सेंद्रिय खत व कीटकनाशक तयार केले आहे. यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि उत्पादन क्षमता वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

लसणापासून तयार केलेल्या कीटकनाशकाचा पहिला प्रयोग नागपुरातील रेल्वे गार्डनमधील झाडावर केला. नागपूरच्या रखरखीत उन्हाळ्यात येथील झाडे टवटवीत दिसत असल्याचे निदर्शनात आले. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील मिरची, कापूस, सोयाबीन, तूर, धान, कारले, टोमॅटो, पालक, वांग्यासह इतरही भाजीपाला पिकांवर या  कीटकनाशकाचा प्रयोग यशस्वी झाला. परिणाम चांगले दिसून आले असून कापसावरील लाल्या, तुडतुड्या, मावा आदी किडींवर हे प्रभावी ठरले आहे. 

उत्पादन क्षमताही वाढली आहे. खराब झालेल्या लसणापासून तयार केलेल्या सेंद्रिय खत व कीटकनाशकाचे परिणाम चांगले आल्यानंतर खराब झालेले कांदे, मिरची, सडलेल्या तांदुळापासूनही कीटकनाशक तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे सर्वच उत्पादने कीडनाशक, बुरशी, उधळी नियंत्रणासाठी अतिशय उपयोगी ठरलेले आहेत. याशिवाय मोसंबी, संत्री, सीताफळ, अंगुर यावरील बुरशीवरही नियंत्रण केलेले आहे. या कीटकनाशकांचे संशोधन यशस्वी झाल्यानंतर त्याची प्रयोग शाळेत तपासणीही केलेली आहे. `झिरो डिफेक्ट ते झिरो इफेक्ट'  या तत्त्वावर हे उत्पादन तयार केले आहे.  

देशातील सेंद्रिय शेतीसाठी ओळखले जाणारे पहिले राज्य असलेल्या सिक्कीम सरकारला माहिती पाठवलेली आहे. भारतात लसणापासून सेंद्रिय खत केले आहे. मात्र, ते इथोनॉल आणि अल्कोहोल बेस होते. त्यामुळे ते सेंद्रिय खतांच्या नियमांची पूर्तता करण्यासअडचणीचे ठरत आहे. अमिताभ मेश्राम यांच्या प्रोव्हेज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संशोधन व विकास करून लसणापासून तयार केलेले सोद्रिय खत व कीटकनाशक हे पहिले पाण्याचा अंश असलेले ठरले आहे. 

सेंद्रिय शेतीलाच भविष्यात वाव 

 कीटकनाशकांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अशा वेळी लसणाच्या खते जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो. राज्य सरकारनेही नुकतेच १८ रासायनिक खतांवर बंदी टाकली आहे. भविष्यात यापेक्षा अधिक रासायनिक उत्पादनावर बंदी घातली जाणार असल्याने सेंद्रिय शेतीलाच भविष्यात वाव असल्याचा दावाही अमिताभ मेश्राम यांनी केला आहे. 

यशस्वी उद्योजक 

अमिताभ मेश्राम यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर दोन वर्ष बंगलूरू आणि हैदराबाद येथे २००० ते २००२ या काळात नोकरी केली. विदेशात जाण्याची तेव्हा खूप क्रेज होती, अमिताभलाही विदेशात जाण्याची संधी होती. मात्र, स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने २००२ साली आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून नागपूर गाठले.  पॅकिंग ॲण्ड ड्रिकिंग वॉटरचे एमसीईडीकडून दिले जाणारे प्रशिक्षण घेतले. पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायात भविष्य चांगले दिसल्याने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र, आर्थिक चणचण, बॅंकांनी कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर हिंमत न हरता अमिताभने बॅंकेचा पाठपुरावा करून कर्ज  मिळविले. व्यवसायात अनेक अडचणी आल्या प्रयोगशीलता आणि धैर्याच्या जोरावर त्यावर मात केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com