सावधान! जंगलात 'हाय अलर्ट' घोषित; अधिकारी झाले सज्ज; पण काय आहे कारण 

forest
forest

वेलतूर (जि. नागपूर) :  यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने जंगलात हिरवळ फारच कमी आहे. दुसरीकडे फेबृवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जंगलात वणवा लागण्याची दाट शक्यता आहे. परिणामी वनविभागाने वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’ घोषित केला आहे. 

सॅटेलाईटद्वारे वणव्यावर नियंत्रण मिळविण्याची तयारीदेखील करण्यात आली आहे. वनविभागाने आधुनिकतेची कास धरली असताना जंगलात लागणाऱ्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही आधुनिक पद्धतीचा अजूनही अंगीकार केला नाही, हे विशेष. त्यामुळे दरवर्षी जंगलात लागणाऱ्या आगीवर पांरपरिक पद्धतीने वनकर्मचारी जीव मुठीत घेऊन नियंत्रण मिळवित असल्याचे चित्र आहे. परंतु मनुष्यबळाची वाणवा, ही खरी समस्या आहे. आणि तेच वणवा नियंत्रणासाठी कारणीभूत ठरु लागले आहे. 

मध्यंतरी दऱ्या, खोऱ्यात लागणाऱ्या जंगलातील आगीत मौल्यवान वनस्पती, वन्यपशू, दुर्मिळ वनौओषधी, झाडे खाक झाल्याचा घटना घडल्या आहेत. राज्यात दरवर्षी दोन लाख हेक्टरच्या जवळपास जंगल जळून खाक होत असल्याची वनविभागाच्या दप्तरी नोंद आहे. विशेषत: तेंदूचे वृक्ष हे मेळघाट, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व यवतमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक आहे. या वनक्षेत्रात वनव्यामुळे लाखो रुपयांच्या पानाची जळून राखरांगोळी होते, अशी माहिती आहे. 

वनविभागाकडून वणव्याबाबत जनजागृती, प्रचार व प्रसार केला जातो. मात्र जंगलात वणव्यावर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळविण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य, सयंत्र, अग्निशमन वाहने आदींची व्यवस्था का केली जात नाही, हा सवाल यानिमित्त्याने उपस्थित होत आहे. जंगलात आग लागली की वनकर्मचारी हिरव्या झाडाच्या फांद्या तोडून त्याने रात्रंदिवस आग विझविण्याचे काम करतात. हाच शिरस्ता वनविभागात अनेक वर्षांपासून कायम आहे. एकीकडे वनविभाग आधुनिकतेची कास धरल्याचा गवगवा करीत असताना वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, सयंत्राचा वापर का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. तप्त उन्हाळ्यात पानगळ झालेल्या पानांच्या घर्षणामुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडतात. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचारी दिवसरात्र एक करतात. मात्र ही आग एवढी भयंकर असते की ती आटोक्यात आणणे हे वनकर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर राहते. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक होते. 

यंदा वणवा लागण्याचे प्रमुख कारण हे पाऊस कमी झाला, हाच निष्कर्ष वनविभागाचा आहे. ऑस्ट्रेलिया, चीनच्या धर्तीवर नियंत्रण असावे. समृद्ध जंगलात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ऑॅस्ट्रेलिया, मलेशिया व चीन या देशाने वनवनव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजना राज्याने देखील कराव्यात अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. राज्यात वनव्यावर नियंत्रण करण्यासाठी वनकर्मचारी तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जंगलात मोठी आग लागल्याची घटना घडली की ते नियंत्रण करणे नेहमीच अशक्य ठरते. 

हे आहे कारण 

यावर्षी जंगलात आग लागण्याची शक्यता अधिक आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प पडल्यामुळे उन्हाळा जोरदार तापणार आहे. किंबहुना १ फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली आहे. पाऊस कमी पडल्याने जंगलात गवत देखील वाढले आहे. त्यामुळे जंगलात आग लागण्याची शक्यता वनविभागातील काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. वनवनव्याच्या पार्श्वभूमीवर ‘ॲलर्ट’ करण्यात आले आहे. जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभाग सज्ज आहे. १५ फेब्रवारी ते जून या कालावधीत जंगलात जाळरेषा तयार करण्यात येणार आहे. फायर वॉचमनच्या नियुक्त्या देखील झाल्या आहेत. आग नियंत्रणासाठी सयंत्र खरेदीची तरतूद असून ती तोकडी आहे, असे अधिकारी दबक्या आवाजात सांगत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com