राम मंदिराची निर्मिती राजस्थानातील दगडातून; पाकिस्तान, बांगलादेशमधील रामभक्तांचीही देणगी स्वीकारणार
नागपूर : अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी राजस्थानमधील बन्सी येथील डोंगरातील दगडाचा उपयोग करण्यात येणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी समितीचे गोविंददेव गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राम मंदिर २० फूट उंच, ३६० फूट लांब आणि २३५ फूट रुंद असणार आहे. मंदिराच्या निर्माण कार्यासाठी ३०० ते ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण परिसरातील कामासाठी अकराशे कोटीपेक्षा जास्त खर्च येणार आहे. साडेतीन वर्षांत याचे काम पूर्ण होईल. सर्वांच्या सहभागातून याचे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान निधी गोळा करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे.
१० ते १००० रुपयापर्यंतची रक्कम रोखीने स्वीकारण्यात येणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेसह इतर देशातील रामभक्तांकडून देणगी स्वीकारण्यात येईल. राम मंदिराच्या निर्माणासाठी यापूर्वी राबविण्यात आलेल्या अभियानाच्या वेळी गोळा झालेले सहा कोटी रुपयेही यात सामील करण्यात आले.
मंदिराच्या निर्माणासाठी नागरिकांनी दिलेल्या विटांचाही उपयोग मंदिर निर्माणासाठी न करता इतर कामासाठी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोविंद शेंडे, राजेश लोया, रवींद्र बोकारे, प्रशांत तितरे, निरंजन लिसालदार उपस्थित होते.
परिसरात यज्ञकुंड, हुतात्मा स्मारक
अयोध्या वैदिक शहर म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. तशा सूचना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मंदिर परिसरात यज्ञकुंडाबरोबरच डिजिटल ग्रंथालय आणि हुतात्मा स्मारकही उभारण्यात येईल. प्रथमोपचाराची सुविधा राहणार असल्याचे गिरी महाराजांनी सांगितले.
पायाचा आराखडा आज ठरणार
प्रथम खोदकाम न करताच मंदिराचा पाया निश्चित करण्याचे ठरविले होते पण आता पायासाठी खोदकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायाचा आराखडा निश्चित करण्यासाठी मंबई, दिल्ली, चेन्नई, गोवाहाटी, रुरकी येथील ‘आयआयटी’ तसेच ‘लार्सन आणि टुब्रो’ व टाटा संस्थेमधील सात तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली. या समितीने दोन आराखडे तयार केले आहेत. मंगळवारला (ता. २९) यापैकी एक आराखडा निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनात पाकिस्तानी, खालिस्तानी
दिल्लीतील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाकिस्तानी आणि खालिस्तानवाद्यांचा समावेश आहे. केंद्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप गोविंददेव गिरी महाराज यांनी लावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.