धम्मदीक्षेच्या पर्वावर खंड प्रकाशनापासून दूर; ४४ वर्षांत केवळ २२ खंड
नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. या लेखनात आजही सरकारसोबत नागरिकांना दिशा देण्याची मोठी ताकद आहे. हे लेखन खंड स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी १९७६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती गठित झाली. तरी खंड प्रकाशनापासून दूर आहे.
गेल्या ४४ वर्षांत केवळ २२ खंड आणि २ सोअर्स मटेरीयल प्रकाशित झाले. नवीन समिती गठित झाल्यानंतर खंड प्रकाशित होईल अशी शक्यता होती. मात्र, धम्मदीक्षेच्या वर्धापन दिनाच्या पर्वावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दी प्राब्लेम ऑफ रूपी’ या सहाव्या खंडाचा अनुवादही प्रकाशित होण्याची आशा मावळली आहे.
समितीने १९९७ साली बाबासाहेबांच्या इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. मात्र आतापर्यंत एकही खंडाचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद प्रकाशित झाला नाही. प्रकाशित खंडाचे पुनर्मुद्रणसुद्धा झालेले नाही. २००४ पासून बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. ३० मार्च २०२१ रोजी नवीन समिती गठित झाली. त्यामुळे खंड प्रकाशित होईल अशी आशा होती; मात्र १९८९ मध्ये लेखन खंड साहित्य मालिकेतील एका महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय प्रबंधाचा ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यात समितीला अपयश आले.
बाबासाहेबांच्या लेखनाच्या आतापर्यंत प्रकाशित खंडांचे पुन्हा मुद्रण व्हावे, अशी कायम मागणी असते. मात्र, या कार्याला गतीच मिळत नाही. त्यामुळेच खंड सहाच्या मराठी अनुवादासह इतरही मराठी अनुवादच्या कार्याची गती मंदावली आहे. बाबासाहेबांच्या नवीन साहित्याचा शोध घेऊन नवीन खंड निर्माण करण्यात यावे.
- प्रकाश बनसोड, भारतीय दलित पॅंथर, नागपूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.