नागपूर : चीनमध्ये करोना विषाणूचा प्रकोप वाढू लागला असताना त्याचा परिणाम हळूहळू भारतीय बाजारांवर दिसू लागला आहे. चीनमधून आयात आणि निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे काही खाद्यपदार्थ स्वस्त झाले आहेत. काहींच्या दरात वाढ झालेली आहे. हिरवा पिस्ता, बदाम व काजूच्या भावात घसरण झाली आहे. कलमी, करणफूल आणि लिंबूसत्वचे भाव वधारले आहेत.
करोनाच्या भीतीमुळे चीनमध्ये ड्रायफ्रूटची मागणी कमी झालेली आहे. तसेच चीनच्या बंदरावर पोहोचलेले बदामाचे कंटेनर पुन्हा भारतात आल्याने व्यापाऱ्यांनी कमी दरात बदाम खरेदी केली. पूर्वीची साठवणूक आणि पुन्हा कमी दरात बदामाची खरेदी. साठवणूक वाढल्याने बदामाच्या भावात प्रति किलो 70 रुपयांची घसरण झाली आहे.
पूर्वी 700 रुपये किलो असलेल्या बदामाचे दर आता 630 रुपयांपर्यंत आले आहे. निर्यात कमी झाल्याने काजूच्या भावातही प्रति किलो 80 रुपयांनी घट झाली आहे. एक किलो काजूसाठी आता 750 ऐवजी 670 रुपये मोजावे लागणार आहेत. इराणमध्ये विक्रमी उत्पादन झाल्याने पिस्त्याच्या भावात प्रति किलो 200 रुपयांनी घट झाली आहे. एक किलो पिस्त्यासाठी 1,275 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी 1475 रुपये प्रति किलो दर होता, असे ड्रायफ्रूट व्यावसायिक अशोक वाघवानी यांनी "सकाळ'ला सांगितले. लग्नसराईचे दिवस लक्षात घेता ज्या व्यापाऱ्यांनी अधिक दरात ड्रायफ्रूट खरेदी केले आहेत, त्यांना थोडे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
चीनमधून भारतात मसाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्यात कलमी, करणफूल आणि लिंबूसत्वचा समावेश आहे. करोनाच्या विषाणूमुळे कलमीसह या मसाल्याची आवक घटली आहे. त्याचा फटका मसाल्यांच्या दरांना बसला आहे. त्यामुळेच एक किलो कलमीसाठी 300 रुपये मोजावे लागत आहेत. पूर्वी 255 रुपये किलो दराने विकली जात होती. करणफुलाचे दरही प्रति किलो 500 रुपयांवरून 550 रुपयांवर पोहोचले आहे. लिंबूसत्वाचे दरही 35 रुपयांनी वधारले आहे असे वाघवानी यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.