मायबाप ! व्यवहारच ठप्प झाल्याने उदरनिर्वाहाचे कसे?

 उमरेड : बाजार समितीत पडून असलेला माल.
उमरेड : बाजार समितीत पडून असलेला माल.

उमरेड (जि.नागपूर) : महिनाभरापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शेतकरी, दूध उत्पादक तथा रोजमजुरी करणाऱ्या सर्वसामान्यांचा जीवन जगण्याचा संघर्ष अधिकच गडद होत आहे. शेतकऱ्यांना कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागते. त्यांचे उभे आयुष्य हे संघर्ष करण्यातच जात असल्याचे चित्र दिसून येते.

ग्राहक फिरकता फिरकेना !

एकीकडे कोरोनाचे तांडव सुरू असताना दुसरीकडे उमरेड तालुक्‍यातील तमाम शेतकरी त्यांच्या शेतातील गहू, हरभरा आदी माल काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा माल काढून झालेला आहे. बाजार समिती शासनाने वाढती गर्दी व कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेत बंद केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना माल विक्री करता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडले असल्याने तो चिंतातुर झाला आहे.शनिवारी उमरेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार खुला करण्यात आला. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मालाची विक्री होईल व आपल्या हातात पैसा मिळेल, या आशेने शेतमाल यार्डात आणून टाकला. परंतु, व्यापारी पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक आले नसल्याने अनेकांच्या हाती निराशा आली. शनिवारी बाजार समितीत हरभरा एक हजार 500 क्विंटल आला असून त्याला भाव 3,500 ते 4,300 रुपये प्रतिक्विंटल असल्याचे समितीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

खर्च निघणेही अवघड
अनेक शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या कुटुंबाची आणि शेतात राबणाऱ्या मजुरांची चिंता सतावत असताना दिसून आले. याशिवाय उमरेड तालुक्‍यातील तथा शहरातील दूध उत्पादक, गोपालक शेतकऱ्यांवरसुद्धा कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. शहरातील खासगी दूध संकलन केंद्र बंद आहेत. तसेच कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्याचे प्रमाण कमी केले आहे. याउलट पशुखाद्याचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे खर्चसुद्धा निघणे अवघड झाले आहे.

दिवसाला शंभर शेतकऱ्यांना "एंट्री'
सावनेर  : तालुक्‍यातील सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री सुरू आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी शेतमाल विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्याला अगोदरच्या दिवशी नोंद करावी लागते. नोंदणीनंतर दररोज 100 शेतकऱ्यांना बाजार समितीतर्फे बोलावण्यात येते. अशांनाच शेतमालासह "एंट्री' दिली जाते. त्यांच्याच शेतमालाची येथील व्यापारी खरेदी करतात. नुकतेच निघालेले हरभरा व गहू पिकाचे उत्पादन बऱ्यांच शेतकऱ्यांना घरी ठेवण्याची अडचण असल्याने व उधार उसनवार देण्यासाठी किंवा प्रापंचिक गरज भागविण्यासाठी पैशांची गरज जाणवत असल्याने मालाच्या विक्रीसाठी घाई केली जाणे साहजिकच आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी येथील बाजार समिती व व्यापारी वर्गातर्फे दररोज शंभर शेतकऱ्यांच्या मालाची नोंद करण्यात येत असल्याचे बाजार समितीचे प्रतिष्ठित व्यापारी विनोद जैन सांगतात.

शेतकऱ्यांचा माल रोखीने खरेदी करावा
शासनाने शेतकऱ्यांच्या मालाची थेट खरेदी करावी. त्यामुळे बाजार समितीत गर्दी होणार नाही आणि शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी आठवड्यातून तीन ते चार दिवस बाजार सुरू ठेवावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देत त्यांचा माल रोखीने खरेदी करावा.
-रूपचंद कडू
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com