'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरीत शोककळा; सरपंचांनाही अश्रू अनावर 

Last rights done on 4 Young Boys in Nagpur district Hivara Hivari Village Latest News
Last rights done on 4 Young Boys in Nagpur district Hivara Hivari Village Latest News

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिवरा-हिवरी गावातील ९ तरुण सोमवारी रात्री महाराष्ट्र दर्शनासाठी एका खासगी वाहनाने निघाले. प्रथम दर्शन गणपतीपुळेच्या श्रीगणेशाचे घेण्यास गेले असता ट्रकला त्यांच्या वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य गंभीर जखमी आहेत. या वृत्ताने हिवराहिवरी गावात शोककळा पसरली. जेष्ठ नागरिक व युवकाच्या वाहनचालक मित्राने सोमवारी ‘महाराष्ट्र दर्शना’ला न जाता मंगळवारी पहाटे निघण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्या युवकांपैकी कुणीच ऐकले नाही आणि दुर्घटना घडली.

मृत चालक शैलेश पंढरी गिरसावळे (वय२५) हा हिवराहिवरी गावचे सरपंच कृष्णाजी गिरसावळे यांचा पुतण्या होता. अन्य तिघे तरुण हे आईवडिलांना एकुलते एक होते. इतकेच नव्हे तर सर्व तरुणांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून ते रोजमजुरीची कामं करून आपल्या आईवडिलांना आर्थिक मदत करीत होते. गावकऱ्यांसोबत या घटनेबद्दल चर्चा केली असता असे निदर्शनास आले की हे तरुण दरवर्षी रोजमजुरीच्या रकमेतून थोडे पैसे हे एखाद्या टूर वर किंवा यात्रेच्या उद्देशाने पर्यटनासाठी राखून ठेवायचे. 

प्रत्येक उन्हाळ्यात ही मंडळी एखाद्या चांगल्या ठिकाणी मोर्चा वळवीत असत. मात्र यंदा आलेल्या कोरोना महामारीमुळे यांचा उन्हाळा पर्यटनाचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे त्यांनी नवीन वर्षात महाराष्ट्र दर्शनाला जायचे ठरविले होते. त्यांनी सोमवारी निघायचे ठरविले. त्यातही चालक हा दुर्घटनेच्या रात्री निघायचे नाही, असे वारंवार म्हणत होता. आपण मंगळवारी पहाटे निघू ,असे सांगत असताना अन्य साथीदारांच्या आग्रहास्तव त्याला त्याच रात्री निघावे लागले. 

रात्री थांबून जा रे.. उद्या निघा..

इतकेच नव्हे तर गावातील अन्य जुनी जाणकार मंडळी जी गावाच्या वेशीवर किंवा मुख्य चौकात बसून गावाच्या हितासंबंधी चर्चा करतात किंवा नवनवे प्रयोग गावाच्या विकासासाठी करीत असतात अशा मंडळींनीसुद्धा त्या तरुणांना आजची रात्र थांबून जा आणि उद्या पहाटे आगेकूच करा, असे सांगत असल्याची माहिती सरपंच श्रीकृष्णाजी गिरसावळे यांनी दिली. काल जर या तरुणांनी ज्येष्ठांचे म्हणणे ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती. कदाचित हा अनर्थ टळला असता, असे उद्गार काढताना सरपंचांना अश्रू अनावर झाले.

सरपंच गहिवरले, म्हणाले खूप वाईट झाले हो !

गावातील तरुणांचा हकनाक बळी गेल्याने गावाच्या विकासात बाधा निर्माण होईल, अशी भावनिक साद सरपंचांनी दिली. जे मृत आईवडिलांना एकुलते एक होते, त्यांच्या जन्मदात्या माता पित्यांचा धीर खचून जाईल आणि जगण्याची उमेद संपुष्टात येईल, अशी भीती वर्तविली. याशिवाय जे तरुण गंभीर अवस्थेत असून उपचार घेत आहेत, त्यांची प्रकृती सुधारत नाही, तोपर्यंत चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी दुःखी अंतःकरणाने सांगितले. ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, ज्यांच्या घरातील तरुण गेला. म्हातारपणातील हातातली काठीच गेली, अशा दुःखी आई वडिलांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com