Look Back 2020:  कोरोनामुळे गेले अनेकांचे रोजगार अन्  ऐन दिवाळीत बाजारात शुकशुकाट; नागरिकांनी दाखवला सुजाणपणा 

Look back 2020 no crowd of people in markets during diwali due to corona in 2020
Look back 2020 no crowd of people in markets during diwali due to corona in 2020

नागपूर : देशात मार्चमध्ये ‘कोविड १९‘ च्या विषाणूचा संसर्ग वेगाने सुरू झाल्यानंतर राज्यात हळूहळू टाळेबंदी करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी देशभरात सर्वत्र टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे सर्वच ठप्प झाले. कामासाठी बाहेरच्या राज्यातून आलेले कामगार, नोकरवर्ग, व्यापारी, कारखान्यातील उत्पादन बंद झाल्याने अर्थव्यवस्थाही ठप्प झाली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच काम बंद पडल्याने अनेकांचा हातचा रोजगार गेला. बर्डी, इतवारी, धरमपेठ, गांधीबाग, महाल, सक्करदरा, सदरसारख्या कायम गर्दी असलेल्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला.

मराठी नवीन वर्ष म्हणून मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यापासून दसरा, दिवाळीपर्यंत आणि ईदपासून ते नाताळापर्यंतचे सर्व सण कोविडच्या सावटाखाली साजरे करण्यात आले. सार्वत्रिक उत्साह आणि धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्याचा सूजाणपणा नागरिकांनी दाखविला. संसर्गजन्य साथरोगाचा सामना करण्याचे भान नववर्षाच्या स्वागतातही कायम राखण्याचे आव्हान केले जात आहे. यामुळे देशाच्याच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर आणि बाजारपेठेवर परिणाम झालेला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने झाल्यानंतर त्याचे आर्थिक, सामाजिक परिणामही समोर येत होते. या व्हायरसमुळे सगळं जग ठप्प झाल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसायांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते अजूनही आहेत. याचा सर्वाधिक फटका झेलणाऱ्या इंडस्ट्रींपैकी एक म्हणजे पर्यटन. टाळेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सोडा, अगदी जिल्ह्या-जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशावेळी पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे सर्व संपून लोक पुन्हा प्रवासाला कधी करणार याबद्दलच्या अनिश्चिततेनंही या ट्रॅव्हल इंडस्ट्रीला ग्रासले होते. आता या व्यवसायाला चांगला दिवस येतील असे वाटत असताना पुन्हा संचारबंदी लागू केल्याने हॉटेल आणि पर्यटन व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

होळीनंतर येणाऱ्या गुढीपाडव्यापासून बाजार लग्नसराई, गणेशोत्सव, दुर्गात्सव, दसरा, ईद, दिवाळीच्या निमित्ताने खरेदीला चैतन्य येते. बाजारातील ग्राहकांची गर्दी तुडुंब असते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद आणि उत्साह असतो. तेही जोमाने ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. नवनवीन योजना जाहीर करतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मात्र, सर्वत्र टाळेबंदी असल्याने बाजारातील चैतन्य हारवले होते. ग्राहकही सामाजिक अंतर ठेवत स्वतःला घरातच बंदिस्त केले होते. त्यामुळे यंदा नागपूरच्या बाजारपेठेत दहा हजार कोटीपेक्षा अधिकचा व्यवसाय ठप्प झाला.

दिवाळीनंतर होणारे हिवाळी अधिवेशनही नागपुरातील बाजारपेठेला उभारी देत असते. यंदा हिवाळी अधिवेशनही नागपुरात न झाल्याने हा व्यवसायही बुडाला. त्यामुळे व्यावसायिकांची चिंता वाढली असून पुन्हा व्यवसाय रुळावर येण्याची प्रतीक्षा केली जात आहे. उद्या संपणारे २०२० हे वर्ष कोरोनाची साथ घेऊन आले असले तरी जाताही ही साथ, तिच्यामुळे झालेले परिणाम कायम राहणार आहेत.

व्यापारी आणि मुंढे

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सम विषम तारखेला बाजारपेठ सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, स्थानिक राजकीय नेत्यामधील वादामुळे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना घूमजाव करावा लागला होता. या वादानंतर एनव्हीसीसीच्या भूमिकेबाबत व्यापाऱ्यांमध्ये कायम संशयाचेच वातावरण निर्माण झालेले आहे.

सम्पादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com