नागपूर : प्रेमाच्या त्रिकोणातून पहिल्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने खून केला. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आऊटर पांढुर्णा येथील रिंग रोडवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आर्यन ऊर्फ रवी गरीब साव (वय २१ रा.इंदोरा) असे मृत प्रियकराचे नाव असून आवेश मिर्झा बेग रहमान बेग (वय २३), कुणाल माधवराव खडतकर(वय २४) आणि आयुष मनोज पेठे (वय २० सर्व रा. आदर्शनगर) अशी आरोपींची नावे आहेत. रवी ट्रान्सपोर्टच्या कंपनीत कामाला तर आवेश सक्करदरा येथील कपड्याच्या दुकानात कामाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर रवी आणि १६ वर्षीय मुलीची मैत्री झाली. त्यानंतर दोघेही भेटू लागले आणि प्रेम फुलले. दरम्यान ऑगस्टमध्ये त्याचे मुलीशी ‘ब्रेकअप’झाले. त्यामुळे मुलीचे ऑक्टोबर महिन्यात आवेश मिर्झा बेग रहमान बेग याच्याशी संबंध जुळले. ही बाब रवीला माहिती झाली. त्याने आवेशला मुलीशी संबंध तोडण्यास सांगितले. मात्र, त्याने रवीला जुमानले नाही. दोघात वाद झाला. त्यामुळे रवीचा काटा काढण्यासाठी आवेशने कट रचला. रवी हा सावनेर येथील सिल्लेवाड्याला आपल्या काकाकडे राहात होता. काही दिवसांपूर्वी त्याचे काका मोतियाबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी एम्समध्ये दाखल झाले.
त्यामुळे तो ये-जा करीत होता. हे आवेशला कळले. त्याने रवीचा गेम करण्यासाठी योजना आखली. त्यानुसार त्याने बुधवारी रवीला फोन केला आणि समझोता करण्यासाठी बोलावून घेतले. आऊटर रिंगरोड पांढुर्ण्याजवळ बोलावून घेतले. आल्यावर आवेश त्याचे दोन मित्र आणि रवी यांनी बिअर पिली. नशा चढताच रवी आणि आवेश यांच्यात वाद झाला. त्यातून तिघांनीही रविच्या पाठीवर आणि पोटावर चाकूने आणि इतर हत्याराने वार करीत जखमी केले. रवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिस निरीक्षक विजय दिघे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील यांनी ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल हॉस्पिटल येथे पाठविला. तपासात कॉल रेकॉंडिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या गुरुवारी सकाळी तिघांनाही परिसरातून अटक केली.
‘तेरे लिए जान दे सकता हू तो ले भी सकता हू’
प्रेमासाठी वाट्टेल ते असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही. आवेश नेहमीच आपल्या प्रेयसीला ‘तेरे लिए जान दे सकता हू तो ले भी सकता हू’ असे म्हणायचा. रवीशी ब्रेकअप झाल्यावर प्रेयसीचे आवेशशी संबंध जुळले. मात्र, रवी त्याला सातत्याने तिच्यापासून दूर राहण्यास सांगत असल्याने अखेर प्रेमातील काटा काढण्याची योजना आखून ती पूर्णत्वास नेली.