result
resultsakal

नागपूर : सीबीएसई निकालास उशीर, प्रवेशाचे गणित बिघडले

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यास उशीर

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यास खूप उशीर होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रवेशाचे गणित बिघडले आहे. सीबीएसई दहावीचा निकाल न लागल्याने शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली असून बारावीच्या निकालाने पदवी प्रवेशावर परिणाम होत आहे.

अकरावी प्रवेशासाठी शहरातील २१० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे ५९ हजार जागा आहेत. सीबीएसईचा निकाल लागेपर्यंत नागपूर शहरात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही, असा आदेश शिक्षण विभागाने जारी केला होता. दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने ग्रामीण भागात ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहरात राहणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी शहरालगतच्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. या महाविद्यालयामध्ये कोचिंग क्लासेससोबत ‘टायअप’ असे समीकरण असते. त्याचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसत आहे.

शहरातील विद्यार्थी जेईई आणि एनईईटीसाठी नामांकित कोचिंग सेंटरमध्ये कोचिंग घेतात. या सेंटर्सचे कनिष्ठ महाविद्यालयांशी टाय-अप आहेत. त्यामुळे अकरावी आणि बारावीच्या दोन वर्षांच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाकडून कोणतेही बंधन नाही. अशा स्थितीत ग्रामीण भागात प्रवेश सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेतला आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असून त्यांचे निकाल येणे बाकी आहे. या विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेऊन कनिष्ठ महाविद्यालयात जागा निश्चित केल्या आहेत.

२९ हजारावर जागा रिक्त राहणार

शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशांवर मोठा परिणाम होणार आहे. सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात जातील. शहरात २८ ते २९ हजार जागा रिक्त राहतील, असा अंदाज आहे. शहरातील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केंद्रीय प्रवेश समितीचे सदस्य रवींद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाकडे केली, मात्र त्याची दखल घेण्यात नसल्याचे दिसून येत आहे.

नागपूर विद्यापीठात २० टक्के जागा वाढणार

दुसरीकडे, सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर न झाल्याने महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश बंद झाले आहेत. यंदा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार होती. त्याची मुदत संपली आहे. अशा परिस्थितीत सीबीएसईच्या निकालानंतर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा नोंदणी पोर्टल सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तसेच ज्या महाविद्यालयांना जागा वाढवायची आहेत त्यांना २० टक्क्यांपर्यंत जागा वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com