Nagpur : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये कर्नाटकातील चार हत्ती आणणार आहेत. त्यातील तीन हत्तींवर शिक्कामोर्तब झाले असून त्यावर प्रधान मुख्य मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी हिरवा कंदील दिला आहे. मादी हत्तीची निवड लवकरच करण्यात येणार आहे.
पुढील एका महिन्यात चारही हत्ती कर्नाटकातून पेंचमध्ये आणले जाणार आहेत. पेंच प्रकल्पातील मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्याच्या चोरबाहुली वन परिक्षेत्रातील बोरबन येथे हत्तींसाठी कॅम्प उभारण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेंच प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली.
मानव- वन्यजीव संघर्षावर नियंत्रण आणणे, वाघांचा मागोवा घेणे, बचाव मोहीम राबविणे, गस्त करण्यासाठी प्रमुख्याने या हत्तींचा वापर करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व मुंबईतील पश्चिम विभागाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन हे करत होते.
बेन यांच्या नेतृत्वाखालील चमूमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, पशुवैद्य डॉ. सुजित कोलंगट, चोरबाहुली वन परिक्षेत्रातील परिक्षेत्र वन अधिकारी राहुल शिंदे आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हत्तीला आणण्याच्या दृष्टीने बेन आणि डॉ. शुक्ला यांनी कर्नाटकातील मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हत्तींच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी, हत्तींच्या व्यवस्थापनाच्या पद्धती समजून घेण्यासाठी, त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी दुबरे आणि मोठीगोंडू हत्तींच्या छावण्यांना भेट दिली आणि शेवटी तीन हत्तींची निवड केली आहे.
पेंच प्रकल्पात येणार कर्नाटकातून हत्ती
दोन दुबारे आणि एक मोठीगोंडू कॅम्पमधील हत्तींची निवड करण्यात आलेली आहे. या छावण्यांमध्ये मादी हत्ती नसल्यामुळे, अधिकारी दुसऱ्या ठिकाणाहून हत्ती पाहणार आहेत. या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, परंतु वनविभाग जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तयारीला लागले आहे.
बोरबन वनक्षेत्र हत्तींच्या छावणीसाठी उत्तम स्थान आहे. नवेगाव-खैरी धरणातील बॅकवॉटरमध्ये प्रवेश, नैसर्गिक अधिवास, मानवी हस्तक्षेपापासून दूर आणि संरक्षणासाठी एक सुरक्षा झोपडी यासारख्या सुविधा आहेत. हत्तींच्या वाहतुकीस विलंब न करता आवश्यक अतिरिक्त पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली जाणार आहे. बेंगळुरू ते नागपूर या लांबच्या प्रवासासाठी ट्रकची व्यवस्था करणे, अत्यावश्यक वस्तू पुरवणे यासह हत्तींची वाहतूक करणे ही आव्हाने आहेत.
तसेच गवत आणि पाण्यासह भातशेती, १२ तासांच्या प्रवासानंतर विश्रांतीसाठी थांबण्याचे नियोजन आणि वैद्यकीय मदत सुनिश्चित करण्याचे काम करण्यात येत आहे. २१ ते ३५ वर्षे वयोगटातील या तरुण वन्यहत्तींना मानव-प्राणी संघर्षाच्या घटनांमधून वाचविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना बचाव कार्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पेंचमधील बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही शुक्ला यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.