जलालखेडा : ज्यांचा कोणी आधार नाही, अशा निराधारांचा उदरनिर्वाह शासनाच्या मानधनावर चालतो. ते बिचारे मागील काही दिवसांपासून बँकेच्या चकरा मारीत आहेत. बँकेत जाऊन साहेब, दिवाळी आहे, आमचे पैसे आले का हो, अशी विचारणा वृद्ध, निराधार करीत आहेत. राज्य शासनाच्या निधीचे सप्टेंबरपर्यंतचे वाटप करण्यात आले आहे. पण केंद्र शासनाचा एप्रिलपासून निधीच मिळाला नसल्याने केंद्राच्या हिस्स्याचे मानधनाचे वाटप थकले आहे.
ज्यांच्या ओठातून पूर्ण क्षमतेने शब्द बाहेर पडत नाहीत, चालणेच काय ज्यांना धड उभेसुद्धा राहता येत नाही, शरीरात बळ नाही. थांबण्याची क्षमता नाही, विधवा आहे, अशा निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांची अलिकडे बँकेत गर्दी होत आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या अन् चिंतेचे सावट केविलवाण्या शब्दात विचारण करतात, साहेब आमचे पैसे आलेत काय जी?
तसे तर ते अर्धवट निराधार सरकारी शिक्का लागल्याने ते पूर्णतः निराधाराच्या श्रेणीत आले. गेल्या सहा महिन्यांचे विविध सरकारी योजनांचे केंद्राचे अनुदान थकले आहे. निराधारांना दिवाळीपूर्वी आधार देण्याचे निर्देश शासनाचे आहेत. त्यामुळे निराधारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण अद्यापही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांच्या दिवाळी सणावर आर्थिक संकटाचे सावट पसरले आहे.
कुटुंबाचा आधार गेला.... आयुष्यात अंधार पसरला. जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले. कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न उभा झाला. तेव्हा निराधारांचा आधार म्हणून संजय गांधी निराधार योजना ठामपणे उभी राहिली. निराधारांना जगण्याचे बळ मिळाले. मुलांच्या शिक्षणासाठी आधारवड ठरला. मात्र, आज अनेकांच्या आयुष्यात अंधार पसरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दिवाळीही अंधारात जाईल, अशी भीती त्यांना वाटते आहे. कारण मागील सहा महिन्यांपासून संजय निराधार योजनेअंतर्गत असलेल्या नरखेड तालुक्यातील इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना व इंदिरा गांधी विधवा योजना या दोन्ही योजनेचे प्रत्येकी ३०० व २०० रुपये प्रति महिना मानधन केंद्र शासनाकडून मिळाले नाही .
निराधारांचा एकमेव आधार म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेंतर्गत असलेल्या विविध योजना आहे. यात नरखेड तालुक्यातील हजारो लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत प्रति माह एक हजार रुपये मानधन मिळते. यात दोन योजनेंतर्गत काही हिस्सा केंद्र शासनाकडून दिला जातो. सहा महिन्यांपासून इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना व इंदिरा गांधी विधवा योजनेचे अनुदान थकले आहे. तर राज्य शासनाच्या हिस्स्याचे अनुदानाचे वाटप झाले आहे.
इतरांप्रमाणे त्यांनाही दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे अशी अपेक्षा त्यांना आहे. मुले असूनही काहीना निराधाराचे जीवन जगावे लागते. त्यांचा आधार हिरावला असला तरी संजय गांधी निराधार योजना त्यांचा आधार बनली आहे. नियमित अनुदान मिळावे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
तांत्रिक कारणामुळे विलंब झाला तरी अनुदान मात्र मिळते, हेही तेवढेच सत्य आहे. योजनेचा लाभ गरजूंना मिळावा योजनेत पारदर्शकता असावी, यासाठी सारी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. सर्व लाभार्थ्यांना आता बँकेतूनच अनुदान मिळते.
सहा महिन्यांपासून अनुदान थकले
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला केंद्र शासनाकडून २० हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. पण हेसुद्धा अनुदान एप्रिल महिन्यापासून मिळाले नसल्याने दारिद्र्य रेषेखालील नरखेड तालुक्यातील ४८ महिलांची सहा महिन्यांपासून प्रतीक्षा कायम आहे.
समितीची स्थापना नाही
नरखेड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समितीची अद्यापही स्थापना नाही. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पालकमंत्री व स्थानिक आमदार संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करतात. यात अध्यक्ष नियुक्त केल्या जाते. पण विधानसभा निवडणूक होऊन तीन वर्ष लोटली तरी समिती मात्र स्थापन करण्यात आली नाही, हे विशेष.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.