
‘नरेंद्र मोदींच्या विरोधात नेतृत्वापेक्षा पर्याय महत्त्वाचा’
नागपूर : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करायचे असेल तर मतदारांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेच आहे. यासाठी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
भाजप विरोधात लढण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहे. यापूर्वी दिल्ली येथे काही पक्षप्रमुख्यांचा बैठकीसुद्धा झाल्या होत्या. मात्र, आघाडीचे नेतृत्व कोणी करावे यावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. याबाबत पवार यांना विचारणा केली असता त्यांनी नेतृत्वावरून कुठलाच वाद नसल्याचे सांगितले.
भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी किंवा बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले तरी आम्हाला कुठलीच हरकत नाही. या संदर्भात काँग्रेसने यापूर्वी घेतलेल्या प्रत्येक बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आघाडी संदर्भात संसदेच्या आगामी अधिवेशनात सर्व विरोधकांना विषयावर सविस्तर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे आंदोलन, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न, पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या किमती, महागाई असे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मोदी सरकाराला घेरण्याची संधी विरोधकांना आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांना एकत्र येण्याची संधी आहे. एकत्रितपणे पुढे जाण्याचा आम्ही विचार करणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
आश्चर्याचा धक्का बसला
अमरावतीच्या दंगलीत रजा अकादमी आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या अहवालावर पवार म्हणाले, हे माझ्या वाचनात आले आहे. हा संवेदनशील प्रश्न असल्याने सत्यता तपासून बघितल्यानंतरच भाष्य करणे योग्य होईल. भाजपचे नेते दंगलीच्या घटनेवर काय बोलले आणि काय बोलतात याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा उधळ भाष्य केल्याने आश्चर्याचा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी किमान राज्याच्या व समाजाचा विचार करणे अपेक्षित होते असेही ते म्हणाले.
एकत्रितच लढण्याची इच्छा
आगामी महापालिका निवडणुका आघाडीने एकत्रित लढाव्या अशी आमची इच्छा आहे. मात्र, त्याबाबत आताच सांगता येणार नाही. वेगवेगळे लढलो तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. प्रत्येकच पक्षाला आपली ताकद वाढवायची असते. वेगळे लढलो तरी आघाडीवर परिणाम होणार नाही.