नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपूरचे वातावरण चांगलेच तापले आहे. लोकप्रतिनीधीविरुद्ध तुकाराम मुंढे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध मोर्चाच काढला होता. नानाविध आरोप करण्यात येत होते. दयाशंकर तिवारीसह सत्ताधारी त्यांच्याविरुद्ध झाले आहेत. या सर्व राजकारणात स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे एकटे पडल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांच काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यात एक प्रश्न महत्त्वाचा होता. "नागपुरात तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त आहेत. त्यांच्यात आणि नगरसेवकांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही पडले होते.' असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढे यांच्या मागे आहात की लोकनियुक्त महापालिकेच्या, जी मुंढे यांच्या मागे लागलीय हात धुऊन, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला.
हा प्रश्न विचारताच सगळ्यांच्या नजरा उद्धव ठाकरे यांच्या उत्तराकडे लागले होते. कारण, प्रत्येकाला या प्रश्नाचे उत्तर पाहीजे आहे. तुकाराम मुंढे कुणाच्या भरोशावर लोकप्रतिनिधी पंगा घेत आहे? त्यांना कुणाचा सपोर्ट आहे? त्यांना मुद्दाम तर नागपुरात पाठवले नाही ना? असे अनेक प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत होते. मात्र, याचे उत्तर कुणाकडेही नव्हते. अशात खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीतून नागरिकांना यांचे उत्तर मिळाले.
"मला अस वाटते, तुकाराम मुंढे नागपुरात गेल्यापासून शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिल पाहिजे? मी शिस्तीच्याच मागे उभा आहे.' अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली. एक अधिकारी कठोर असू शकतो. कडक असू शकतो. त्याच्या कठोरपणाचा नागरिकांच्या हितासाठी उपयोग होत असेल तर वाईट काय? त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणले, हे काही जणांना परवडत नसेल. म्हणून ते विरोध करीत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तुकाराम मुंढे यांनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहील पाहिजे. शिस्त लावली जात असेल आणि जनतेचे हित जोपासल जात असेल तर चांगले आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत आहे. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी डोळे उघडे आहेत, हे विसरून चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही नागपुरातील नद्यांचे व्यवस्थापण उत्कृष्ठपणे केल्याबद्दल तुकाराम मुंढे यांचे ट्विटरवर कौतुक केले आहे. मुंढे आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील आतापर्यंतचा संघर्ष बघितला तर हे लक्षात येते की, मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्रीसुद्धा तुकाराम मुंढे यांच्या सोबत आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार मुंढे यांच्यासोबत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार तुकाराम मुंढे यांच्या सोबत असल्याने त्यांना नमविण्यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना जास्त कष्ट उपसावे लागणार आहे. राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा आणि मुंढे यांचा निश्चयी स्वभाव यामुळे सत्ताधाऱ्यांना ते जमेल की नाही, हे येणारा काळच सांगणार आहे. पण हा संघर्ष इतक्यात थांबणारा नाही, हेही तेवढेच खरे.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.