नागपूर : गेल्या पंधरा दिवसात शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण भागांतून १०० पेक्षा अधिक पक्ष्यांना ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी आणले आहे. उन्हामुळे शक्ती कमी होणे, प्राण्यांमध्ये उष्माघातासारखा त्रासही दिसून येत आहे. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दररोज सात ते आठ पक्षी येत असून उपचारानंतर त्यांना मुक्त करण्यात येत आहे. पाळीव, जंगली प्राण्यांनाही उच्च तापमानाचा फटका बसत आहे.
प्राणी व पक्ष्यांना नैसर्गिक स्रोतांमधून गरज भागवावी लागत असल्याने उन्हाळा नकळत त्यांच्या जीवावर उठला आहे. भटकी जनावरे, श्वान, माकड व पक्षीही उष्माघाताचे शिकार होत आहे. उष्णतेमुळे सध्या पक्ष्यांना यांना मोठ्या प्रमाणावर अतिसाराची समस्या होत आहे. तर काही खार, कोतवाल, चिमण्यासह इतरही पक्षांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे दिसते. पाळीव प्राणीही बेहाल झालेत. मागील पंधरवड्यात सेंटरमध्ये येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे. त्यात बहुतांश पक्षी हे सर्वसामान्य नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी आणून दिलेले आहेत.
त्यातील अनेक पक्षी हे बेशुद्धावस्थेत आढळलेले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पक्ष्यांचा जीव वाचवा या उद्देशातून हे पक्षी येथे आणून देत आहे. जंगल परिसरात उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटल्याने मोठ्या प्रमाणावर जंगलातील पक्षी शेत-शिवारात दिसू लागले आहेत. अचानक वातावरणीय बदल, अति तापमानामुळे पक्ष्यांना अतिसार, उष्माघात होत आहे असे पशुवैद्यकीयांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी पक्ष्यांसाठी घराच्या बाहेर पाण्याची व्यवस्था करावी. जखमी अथवा बेशुद्धावस्थेत पक्षी दिसल्यास रेस्क्यू सेंटरमध्ये आणून द्यावे. अथवा ०७१२- २५१५३०६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- कुंदन हाते, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.