कोण ‘तो’? आसवांच्या ओंजळीत सोडून गेला आठवणींचे पक्षी!

file
file

कन्हान (जि.नागपूर):अल्पावधीतच साहित्य क्षेत्रात स्वतःच्या शैलीचा ठसा उमटविणारे, माजी भारतीय सैनिक आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद येथे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कर्तव्यदक्ष इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बबनराव भगवान वासाडे यांचा कर्तव्यावर असताना कोरोना आजाराने हैद्राबादच्या दवाखान्यात मृत्यूशी झुंज देताना शनिवारी (ता.१२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या बातमीने परिसरातील प्रत्येक जण गहिवरला. कारण त्यांचे जाणे काळजाला हेलावणारेच आहे.

संवेदनशील मनाचा‘माणूस’
बबन वासाडे यांचा जन्म टेकाडी (को.ख) येथे १५ नोव्हेंबर १९६२ ला झाला. लहानपणापासून आईवडिलांचे संस्कारमय जीवन,आध्यात्मिक वारसा, अशा कुटुंबात ते घडले. परिसरात त्यांना भाऊ म्हणून ओळखले जायचे. एक दिलखूश, मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, सांगीतिक कार्यक्रमात निवेदक, स्वतःचे छंद जोपासत. उत्तम चित्रकार, उत्कृष्ट लेखक, कलावंत म्हणून ते स्वच्छंदपणे जीवन जगले. गरजूंना नेहमीच मदत करणारे, जनमानसात अष्टपैलू कलावंत म्हणून लोकप्रिय बबनभाऊंमध्ये अहकारांचा किंचित लवलेशही नव्हता. भाऊ म्हणजे अंत्यत नम्र, साधा स्वभावाचा, संवेदनशील मनाचा माणूस.  गावात आल्यावर लहानमोठ्या प्रत्येकाशी आपुलकीने, प्रेमाने, विचारपूस करणारा, कोणत्याही प्रायोजित कार्यासाठी सर्वांशी विचारविनिमय करून निर्णय घेणारा बबनभाऊ बालपणापासून सर्वात रममान होण्याचा स्वभाव. सहकाऱ्यांना सोबत घेऊन छोटीछोटी नाटके बसविणे, भूमिका वटविणे असा त्यांचा छंद. या आवडीतूनच सहकारी मित्रांना सोबत घेऊन नवचैतन्य युवा संघ सांस्कृतिक कार्यक्रम घेणारी, सामाजिक कार्य करणारी संस्था निर्माण केली. या छोट्याश्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाला.
 
अधिक वाचाः ‘त्यांनी’ भर बाजारात भाजीविक्रेत्यांना बेदम काढले झोडून, अशी काय झाली होती चूक ?

 

सैन्यात १६ वर्ष देशसेवा
दरम्यान विज्ञान शाखेतून पदवी मिळविल्यानंतर देशसेवेच्या प्रबळ इच्छेने घरच्यांचा विरोध न जुमानता भारतीय स्थलसेनेत भरती झाले. नोकरीदरम्यान शिक्षण सुरू ठेऊन इतिहास व समाजशास्त्राच्या पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर सुध्दा ते स्वस्थ न बसता ‘प्रमोशन’ मिळवत हवालदारापासून लिपीक पदापर्यंत पोहचले. सैन्यात १६ वर्ष देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होऊन भारत सरकारच्या आदिवासी विभाग चंद्रपूरला ३ वर्षे नोकरी केली. १७ ऑक्टोबर २००८ पातून भारत सरकारच्या गृहमंत्रालयांतर्गत आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे इंटेलिजन्स ब्युरोत इमिग्रेशन अधिकारी म्हणून रुजू झाले. यादरम्यान नोकरी व्यतिरिक्त साहित्य क्षेत्रातील छंदाची जोपासना करीत अनेक मराठी, हिंदी भाषेत आध्यात्मिक विषयावरील पुस्तके, कवितेची पुस्तके, अभंगाची पुस्तके लिहिली. त्यांनी दोन वर्षांपासून टेकाडी गावात गरजू, गरिबांना मदत म्हणून ‘स्व. लक्ष्मीबाई भागवनजी वासाडे’ ही सामाजिक संस्था स्थापन करून समाजातील गोरगरिबांना स्व:खर्चाने मदत करण्याचे कार्य केले. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा धनी अचानक ‘आठवणीतील पक्षी’ झाला. त्यांच्या अशा जाण्याने परिसरातील प्रत्येक जण हळहळला.

वासांडेंची साहित्यसंपदा
श्रीगुरुपाठ, अभंगावली ही अभंगाची, तर ‘गीत रामायण’ हा हिंदीगीतांचा संग्रह, ‘गीत कृष्णायन’ मराठी गीतांचा संग्रह, ‘अभंग रामायण’ अभंग रूपात रामायण आणि लेटेस्ट ‘गीत रामायण’ (मराठी गीतांचा संग्रह) हे अध्यात्मिक भक्तीगीत संग्रह, तसेच ‘आसवांची ओंजळ’ हा मराठी कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबईने प्रसिद्ध केला. 'आठवणींचे पक्षी' (मराठी कवितासंग्रह) अशी ८ प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित झाली. काही पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात खरा मृत्युंजय, भीष्म पितामह (मराठी कादंबरी), मर्यादा पुरुषोत्तम (मराठी कादंबरी), गुरुदास श्लोक, रामायण, गृहगीता,  गुरुदास गीता, अभंगवाणी, यांदो के झरोकेसे( हिंदी संग्रह), प्रेम केले म्हणून (मराठी तीन अंकी नाटक) या पुस्तकांचा समावेश आहे.

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com