गडचिरोली - नक्षलविरोधी अभियानाला गेल्या काही वर्षांत मिळालेल्या यशामुळेच पोलिस अधिक गाफील झाले. यातून कुरखेडा उपविभागात गेल्या काही वर्षांत एकही मोठी घटना नक्षलवाद्यांनी घडवून आणली नाही. त्यामुळे या परिसरातून ते बेपत्ता झाले, असा समज करून अनेक जवान खासगी कामांसाठी बाहेर पडत असत, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये कोंबडा बाजाराला उपस्थिती, विनापरवानगीने दारूविक्रेत्यांकडे कारवाईसाठी जाणे, असे प्रकार नित्याचे झाले होते, अशी चर्चा नागरिकांत ऐकायला मिळत आहे.
30 एप्रिलच्या मध्यरात्री दीडशेहून अधिक नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडविला. यात पुराडा व त्यानंतर दादापूरकडे रवाना होणाऱ्या जलद प्रतिसाद पथकातील 15 जवान आणि खासगी वाहनचालक हुतात्मा झाले. साधारणतः जाळपोळ केल्यानंतर पोलिस पंचनामा करण्यासाठी येणार म्हणून नक्षली वाटेत भूसुरुंग पेरून नंतर त्याचा स्फोट घडवून आणतात. बऱ्याच घटनांमध्ये असा अनुभव पोलिसांना आला आहे. त्यामुळे दादापूर येथील जाळपोळीचा संबंध जांभूरखेड्याच्या भूसुरुंग स्फोटाशी जोडला जात आहे. नक्षली आपली चळवळ चालविण्यासाठी तेंदू कंत्राटदार, बांबू खरेदी व वाहतूक करणारे कंत्राटदार आणि पेपरमिल, तसेच अन्य तत्सम लोकांकडून खंडणी वसूल करतात. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून पेपरमिलवाल्यांनी बांबू खरेदी बंद केल्याने नक्षलवाद्यांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे रस्ते आणि पूल बांधकाम करणारे कंत्राटदार यांना नक्षलवाद्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून लक्ष्य केले. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर महामार्ग, अन्य रस्ते व पुलांची कामे मंजूर झाली आहेत. यातील अनेक कामे दुर्गम भागात असल्याने कंत्राटदार वा संबंधित कंपन्या नक्षलवाद्यांशी देवाणघेवाण करून आपली कामे करतात, हे आजवर लपून राहिले नाही.
|