ऐन दिवाळीच्या तोंडावर वर्ध्यातून साखर झाली गायब; निम्म्याच लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड

no sugar vailable in ration shop in wardha
no sugar vailable in ration shop in wardha

वर्धा : प्राधान्य कुटुंब योजना आणि शेतकरी लाभार्थ्यांची दिवाही गोड करण्याकरिता शासनाने त्यांना 20 रुपये किलोच्या दराने साखर देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडे अपेक्षित साठा नसल्याने दिवाळीपूर्वी असलेल्या लाभार्थ्यांपैकी निम्म्यांनाच साखर पुरविण्यात येणार आहे. यामुळे योजनेत येत असलेल्या मोजक्‍याच लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

सध्या असलेली परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या वतीने रेशन कार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब योजना आणि शेतकरी लाभार्थ्यांना 20 रुपये किलोच्या दराने साखर देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या योजनेत जिल्ह्यात तब्बल अडीच लाख लाभार्थी येतात. या प्रत्येक लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी प्रती कार्ड एक किलो साखर देण्यात येणार आहे. 

एवढी साखर पुरविण्याकरिता जिल्ह्याला आवश्‍यक असलेले नियतन प्राप्त झाले नाही. यामुळे सर्वच लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी साखर मिळणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे.

गरजवंतांची दिवाळी गोड करण्याकरिता शासनाच्या वतीने साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण प्रत्येक लाभार्थ्याला साखर पुरविण्यासंदर्भात झालेल्या नियोजनाची योग्य रित्या अंमलबजावणी झाली नसल्याने वर्ध्यातील निम्म्याच लाभार्थ्यांना साखर मिळणार असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात उद्यापर्यंत साखर पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या गोदामात पोहोचलेली साखर जिल्ह्यातील रेशन दुकानात एका दिवसात पोहोचणे कठीण आहे. यामुळे दुकानात पहिले येणाऱ्यांनाच लाभ मिळण्याची शक्‍यता आहे.

लाभार्थ्यांच्या तुलनेत हवी 2,300 क्‍विंटल साखर

योजनेत सहभागी असलेल्या लाभार्थ्यांकरिता दोन हजार 300 क्‍विंटल साखरेची गरज आहे. असे असताना जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात आजच्या स्थितीत केवळ 600 क्‍विंटल साखर शिल्लक आहे. साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. ते येण्यास विलंब होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना साखर मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

काळ्या बाजाराची शक्‍यता

शासनाची योजना असल्याने सहभागी लाभार्थी साखर घेण्यासाठी रेशन दुकानात जाताच यावेळी दुकानदारांकडून त्याला साखर नसल्याचे सांगण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय रेशन दुकानातील साठा खासगी व्यापाऱ्यांकडे गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा प्रकार या काळात घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे याकडे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने लक्ष देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या तुलनेत साखरेचे आवश्‍यक नियतन मंजूर करण्यात आले आहे. ते पोहोचण्यासाठी काही काळ लागणार आहे. सध्या असलेल्या साठ्यातून नागरिकांना शासनाच्या आदेशाप्रमाणे साखर मिळणे शक्‍य आहे.
- रमेश बेंडे
जिल्हा पुरवठा अधिकारी,

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com