परदेशी पाहुण्या पक्ष्यांची संख्या कमी होण्याची शक्‍यता

गडचिरोली : दरवर्षी हिवाळ्यात येणारे मोठी लालसरी (रेड क्रेस्टेड पोचर्ड) नावाचे परदेशी बदक.
गडचिरोली : दरवर्षी हिवाळ्यात येणारे मोठी लालसरी (रेड क्रेस्टेड पोचर्ड) नावाचे परदेशी बदक.

गडचिरोली : यंदा देशात भरपूर पाऊस झाल्याने युरोप, सायबेरिया, ब्रिटन, बलुचिस्तान, बाल्टिस्तान, रशिया आदी सुदूर देशांतून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या महाराष्ट्रात घटण्याची शक्‍यता पक्षीअभ्यासक व्यक्त करीत आहेत.
बहुतांश स्थलांतरित पक्षी उत्तर भारतातून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांचा प्रवास करीत तिथे मुक्काम ठोकत. नंतर दक्षिणेकडचा प्रवास करीत महाराष्ट्रात येतात. पण, यंदा उत्तर भारतातही भरपूर पाऊस झाल्याने नदी, तलाव आदी जलस्रोत तुडुंब असून, या पक्ष्यांचे खाद्यही उपलब्ध आहे. त्यामुळे तिकडेच रमण्याची, रेंगाळण्याची शक्‍यता आहे. ज्यावेळी सूर्य दक्षिण गोलार्धात असतो तेव्हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तिथे दिवस छोटा असल्याने अंधार लवकर पडतो. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळविण्यासाठी वेळ कमी मिळतो. युरोप, रशिया, सायबेरिया, ब्रिटन आदी ठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी होते. त्यामुळे जलाशये गोठून जातात. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळत नाही. त्याच वेळेस भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात गुलाबी थंडीला सुरुवात झालेली असते. पावसाळा नुकताच संपल्याने जलाशये तुडुंब असतात. या परदेशी पाहुण्यांना आवडणारी शेवाळे, पाणवनस्पती, किटकांची प्रचंड उपलब्धता असते. अशावेळेस हे पक्षी दक्षिणेकडे म्हणजे आपल्या भागात स्थलांतर करतात. त्यांना जिथे खाद्य व अनुकूल वातावरण उपलब्ध असेल तिथे ते जास्त वेळ राहतात. अन्नाची अनुपलब्धता, शिकार, पाणथळ जागांवर मोठ्या प्रमाणात मासेमारी, माणसांची वर्दळ अशा समस्या असल्यास पुढे प्रवास करून पुढच्या जागेवर जातात. यापूर्वी 1996, 2005 मध्ये गुजरात, राजस्थान आदी राज्यांमध्ये दुष्काळ पडल्याने महाराष्ट्रात परदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. कधी-कधी काही पक्षी मध्ये न थांबता दूर दक्षिणेकडे किंवा इतर ठिकाणी एका दमात निघून जातात. पण, परतीच्या प्रवासात (रिव्हर्स मायग्रेशन) ते आपल्याकडे थांबू शकतात.
आपल्याकडेच पाहुणे
महाराष्ट्रात विविध प्रकारचे धोबी, थापट्या, पट्टकादंब, कलहंस, राजसरी, मोठी लालसरी, तरंग, गडवाल, चक्रवाक, सररूची, सुंदर बटवा, कंठेरी चिलखा, सुरय, तार भिंगरी, चमचाबाज, तुतवार, शेकाट्या, कृष्ण कौंच, कुरव, दलदल ससाणा, शंकर, भुवई असे अनेक परदेशी पाहुणे येतात.

यंदा भारतात भरपूर पाऊस झाला. आधीच्या ठिकाणी खाद्य उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्राकडे स्थलांतरित पक्षी कमी येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. खरेतर स्थलांतरित पक्ष्यांवर खूप संशोधन करण्याची गरज आहे. एकच तलाव निवडून दरवर्षी त्या तलावावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या किमान दहा वर्षे नियमित नोंदी घेतल्यास अचूक माहिती मिळू शकेल.
-संजय करकरे, सहायक संचालक,
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com