वृक्षलागवडीची ऑनलाइन नोंदणी खड्ड्यात

file photo
file photo

चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या 33 कोटी वृक्षलागवडीची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. परंतु, जिल्ह्यातील सुमारे 13 विभागांनी नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. मोहिमेला 15 दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, नोंदणीच न झाल्याने या विभागांनी वृक्षलागवड केली की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनेक विभागांकडून वृक्षलागवड मोहिमेबाबत उदासीनता दाखविल्याचे चित्र यातून स्पष्ट होते.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आनंदवनातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड केली जाणार आहे. जिल्ह्याला एक कोटी 71 लाख 19 हजार 488 उद्दिष्ट देण्यात आले आहेत. जिल्ह्यात 13 जुलैपर्यंत 68 लाख 96 हजार 762 रोपट्यांची लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी 47.42 एवढी आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ या विभागांचा वृक्षलागवड मोहिमेत मोठा वाटा आहे. तर, वन्यजीव विभागाने अवघ्या अकरा दिवसांत उद्दिष्टपूर्ती केली आहे. पालक सचिवांसह वरिष्ठ पातळीवरून जिल्ह्याचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. मनपा, नगरपालिकांनी आतापर्यंत 0.49, ग्रामपंचायत 1.60, कृषी 6.27, ऊर्जा 5.6, तर सहकार विभागाने 3.58 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. वृक्षलागवडीत या विभागांचा वेग मंदावल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काळात वृक्षलागवडीची गती वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com