विदर्भातील पहिल्या महिला सत्याग्रही कोण तर पार्वतीबाई शिवाजीराव पटवर्धन, वाचा इतिहास...

Parvatibai Shivajirao Patwardhan, the first woman Satyagrahi from Vidarbha
Parvatibai Shivajirao Patwardhan, the first woman Satyagrahi from Vidarbha

अमरावती : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ज्या दाम्पत्याने सक्रिय सहभाग घेऊन भूमिका बजावली त्यामध्ये अमरावतीच्या पटवर्धन दाम्पत्यांचे नाव अग्रस्थानी आहे. असहकार आंदोलनापासून देश स्वातंत्र्य होईस्तोवर पार्वतीबाई व शिवाजीराव पटवर्धन यांनी धडाडीने कार्य केले. विदर्भातील स्त्री पुढाऱ्यांपैकी अटक होण्याचा पहिला मान पार्वतीबाई पटवर्धन यांना जातो.

पार्वतीबाई या मुळच्या सातारा जिल्ह्यातील वडूस या गावच्या. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यादरम्यान स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता. १९२० पासून अमरावतीच्या महिलांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यास सुरूवात केली. त्याचवर्षी पार्वतीबाई प्रांतिक काँग्रेसच्या सदस्य झाल्या. असहकार आंदोलनात सहभागी व अग्रेसर होत त्यांनी असहयोग व विदेशी कापडावर बहिष्काराचा प्रचार केला.

१९२९ मध्ये प्रांतिक काँग्रेस कमिटीतर्फे विदर्भातील अनेक गावांना भेटी देत राष्ट्रीय कार्याचा प्रचार त्यांनी केला. १०३० मधील सविनय कायदेभंग चळवळीतील त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. या चळवळीत अमरावती जिल्ह्यातील ठिकठिकाणी झालेल्या जंगल सत्याग्रहात त्या सक्रिय होत्या. नोव्हेंबर १०३० मध्ये दारूभट्टी लिलावाविरुद्ध पार्वतीबाई पटवर्धन यांच्या नेतृत्वात ५० देशसेविका व १५० स्वयंसेवकांनी रणशिंग फुंकले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पार्वतीबाईंना अटक केली. त्यांना सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा झाली.

मार्च १९३१ साली त्यांची तुरुंगातून सुटका झाली. १९३२ साली कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू होताच पार्वतीबाईंच्या सभा अमरावतीत सुरू झाल्या. सरकारने त्यांना पुन्हा अटक केली व एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली. १९२० पासून पार्वतीबाईंनी सुरू केलेले राष्ट्रीय कार्य स्वातंत्र्य मिळेस्तोवर अविरत सुरू होते. स्वातंत्र्य लढ्यासोबतच त्यांचे सामाजिक कार्यही सुरू होते. शिवाजीरावांच्या सामाजिक कार्याला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. कुष्ठरुग्णांसाठी शिवाजीरावांनी सुरू केलेल्या तपोवनातील त्यांचे योगदान फार मोठे आहे.

तपोवनच्या जडणघडणीत सक्रिय सहभाग
१९५० पासून पार्वतीबाई पटवर्धन या तपोवनच्या सचिव झाल्या. कुष्ठरुग्ण, तुरुंगातील कैदी, अनाथ मुले, परितक्‍त्या महिला, कुष्ठरुग्ण महिला अशा पाच पातळ्यांवरील जबाबदारी पार्वतीबाई यांनी सक्षमपणे सांभाळली. पुनर्वसन, महिलांचे विवाह यात सुद्धा त्यांनी विशेष लक्ष दिले होते. तपोवनच्या जडणघडणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
- डॉ. सुभाष गवई,
उपाध्यक्ष, तपोवन

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com