यवतमाळात मांडलाय पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा, हिवाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा

people facing water scarcity issue in yavatmal even in winter season
people facing water scarcity issue in yavatmal even in winter season

यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. अनेक भागात पाच ते सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. 

शहरातील कचरा प्रश्‍नानंतर दुसरा सर्वांत मोठा प्रश्‍न पाणीपुरवठ्याचा आहे. निळोणा व चापडोह प्रकल्पांत पुरेसा जलसाठा असूनही शहरातील अनेक भागातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विस्कळित नियोजनाचा मन:स्ताप नागरिकांना सहन करावा लागतो आहे. अशातच जीवन प्राधिकरणाच्या कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या पाच दिवसांपासून कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाल्याचे दिसून येत आहे. कामगारांच्या आंदोलनामुळे जीवन प्राधिकरणाने आपले कर्मचारी तसेच इतर कामगारांना घेऊन काम सुरू केले आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित कामे पूर्ण होताना दिसत नाही. परिणामी, पाणीपुरवठ्याचा पाच ते सहा दिवसांचा खंड पडला आहे. हे अंतर भरून काढण्यासाठी जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे तारांबळ उडाली आहे. अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत. मात्र, अजूनही त्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आलेले नाही. पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने अनेक भागात नागरिकांची पाण्यासाठी ओरड सुरू आहे. जीवन प्राधिकरणाच्या योग्य नियोजनाअभावी बारमाही अनेक भागातील नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागतो. सध्या बेंबळा प्रकल्पावरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही जलवाहिनी सुरू होण्यास आणखी किती विलंब होणार हे निश्‍चित सांगता येत नाही. शहरात नवीन जलकुंभ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. मात्र, अजूनही शेवटच्या नागरिकांपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यातच आता कामगारांच्या संपाची भर पडली आहे. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिकांना टँकर बोलविण्याची वेळ आली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ गेल्या आठवड्याभऱ्यापासून सुरू आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अजूनही त्यांना यश मिळाले नाही.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची उडाली भंबेरी -
कामगार संपावर गेल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. प्रत्येक भागात पाणीपुरवठा नियमित करण्यात अजूनही यश मिळाले नाही. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा झालेला नाही. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिक जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक देत आहेत. परिणामी अधिकारी, कर्मचारी कामाला लागले असले तरी माहिती अभावी नियोजन होत नसल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com