नांदुरा (जि.बुलडाणा) : यावर्षी पाऊस वेळवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे.
यात बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरने मशागत करण्यावर शेतकऱ्यांचा जोर आहे. आगामी खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकरात लवकर करण्यात येऊन बी-बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
गेल्या वर्षी बेमोसमी पावसाने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षीच्या खरिपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी हाती येईल या आशेने शेती मशागत करण्याच्या कामाला सध्या वेग आहे. बैलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. मात्र ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो.
शिवाय बैलजोडीने मशागत करताना वेळ वाया जातो व समाधानकारक मशागत होत नाही. यापेक्षा ट्रॅक्टर सहज उपलब्ध होते. शिवाय वेळेची बचत होते आणि शेताची नांगरणी खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे. परंपरागत बैलजोडीच्या सहाय्याने मशागत न करताना आधुनिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यावर जोर दिसून येत आहे.
जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांपेक्षा शेणखत शेतात टाकत आहेत. परिसरातील सर्वच विंधन विहिरी व तलावांनी तळ गाठला असतांना ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी यावर्षी मे महिन्यात कापूस लागवड करणार असले तरी बोन्डअळी व कापसाच्या भावातील मंदी पाहता यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटणार आहे.
अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळिराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला. मात्र तरी देखील यंदा नवीन जोमाने व आशेने मशागतीच्या कामाला लागला आहे.गेल्या महिनाभरापासून कोरोनामुळे शेतकऱ्याच्या शेतातील कपाशी व मका अजून घरातच आहेत लॉकडाउन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात साठवून ठेवलेली मका व घरात थप्पी मारून ठेवलेला कापूस योग्य भाव नसल्यामुळे विकावा तरी कसा याबाबत शेतकऱ्यांत चिंता आहे. शेतातील पीक अजुन घरीच पडून असल्यामुळे पेरणीकरिता बियाणे खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होताना दिसत आहेत
पीककर्ज वाटप प्रक्रिया संथगतीने
खरीप हंगाम महिन्यावर येऊन ठेपला असताना कर्जमाफीचे अजून भिजत घोंगडे आहे.दोन लाखा वरच्यांना कोणत्याही गाईडलाइन आल्या नसून ज्यांचे कर्जमाफ झाले ते बँकांत गर्दी करत असले तरी पीककर्ज वाटपाची संथगती पेरणीपर्यंत कर्ज देण्यास अपुरी पडणार आहे.
शेतकऱ्यांना करावे लागणार नगदी व्यवहार
नेहमीप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे खाते कृषिकेंद्राकडे उधारीचे असतात. माल विकला की पैसे देण्याची ही जुनी परंपरा असून या वर्षी कोरोनाने धमाल केल्याने अनेक कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनाही पैशाची नितांत गरज भासत असल्याने रोखीच्या व्यवहारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.