विदर्भाचा कॅलिफोर्निया उपेक्षितच; आणखी एका संत्रा प्रकल्पाची घोषणा झाली खरी पण पुर्णत्वावर प्रश्नचिन्ह 

orange farm
orange farm

वरुड (अमरावती) ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या मोर्शी- वरुड परिसरात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असूनही यावर आधारित एकही उद्योग गेल्या अनेक दशकात येथे उभा होऊ शकला नाही. प्रकल्प निर्मितीच्या घोषणा अनेकवेळा होऊन उद्योग केवळ कागदावरच राहिला असला तरी पुन्हा आता नव्याने संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्याची घोषणा शासनाने केली आहे. हा प्रकल्प तरी पूर्णत्वास जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील काय? असा प्रश्‍न करण्यात येत आहे.

विदर्भात वरुड, मोर्शी, परतवाडा, अचलपूर, काटोल, नरखेड हा परिसर संत्राबेल्ट म्हणून ओळखला जातो. संत्रा फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने हिरव्यागार संत्रा बागांनी समृद्ध असलेल्या या परिसराला विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख मिळाली. मात्र मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन होऊनही या परिसरात संत्र्यावर आधारित एकही प्रक्रिया उद्योग गेल्या अनेक दशकात उभा होऊ शकला नाही. परिणामी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आपली संत्री मातीमोल भावात विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

या ठिकाणी प्रक्रिया उद्योग होण्यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली. 2017 मध्ये माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून मोर्शी येथे तत्कालीन शासनाने संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार मोर्शी तालुक्‍यातील ठाणाठुनी येथे प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मात्र शासन बदलले व प्रकल्प मागे पडला. आता पुन्हा आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या मागणीची दाखल घेत मोर्शी येथे संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे आतातरी हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्याला सुगीचे दिवस येतील काय असा प्रश्‍न करण्यात येत आहे.

गेल्या दोन दशकांपूर्वी मोर्शी येथील मायवाडी व काटोल येथे संत्रा ग्रेडिंग व्हाक्‍सीन सेंटर सुरू करण्यात आले होते. काही दिवस येथून संत्रा पॅकिंग करून देशात व देशाबाहेरही पाठविला जात होता. यासाठी महाऑरेंजने पुढाकार घेतला होता. मात्र या दोन्ही ठिकाणी संत्रावर प्रक्रिया करून उद्योग उभा होण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. तर 2017 मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणाठुनी येथील संत्रा प्रक्रिया उद्योगाचे उद्‌घाटन केले होते, मात्र त्याचेही भिजत घोंगडे कायम आहे.

जिवापाड मेहनत करून आम्ही संत्रा पिकवितो. मात्र तो तयार होताच अल्प दराने विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. यासाठी प्रक्रिया उद्योग होणे गरजेचे आहे. मात्र शासन केवळ घोषणा करते. उद्योग कागदावरच उभा राहतो. गेल्या अनेक वर्षांपासून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आता केलेली घोषणा फोल ठरू नये.
- दिनेश भोंडे, 
संत्रा उत्पादक शेतकरी.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com