बुलडाणा : रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे महत्वाचे नेते आहेत. रविकांत तुपकर, त्यांचे अंगरक्षक व स्वीय सहाय्यकांवर झालेला हल्ला खेदजनक आहे. या हल्ल्याविषयी राजू शेट्टी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलले. तसेच पत्र देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अनेक अन्याय आम्ही पचवले आहेत. मात्र, जिवावर उठणारे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. तुपकारांच्या केसालाही धक्का लागला तर राज्यभर आंदोलन पेटवू, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
रविकांत तुपकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी. यासंदर्भात स्वाभिमानीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र दिले आहे. त्यासाठी आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यापूर्वीही तुपकर यांच्या शेतातील सोयाबीनच्या दोन ढिग पेटवून देण्यात आले होते. आताही त्यांना वेळोवेळी धमक्या देण्याचे प्रकार घडत आहेत. यामागे राजकीय सुडबुद्धी असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तरच सूत्रधाराचा शोध लागेल. त्यासाठी तत्काळ चौकशी सुरू करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.