राममंदिर राजकीय नव्हे सत्त्वाचा विषय - डॉ. मोहन भागवत

राममंदिर राजकीय नव्हे सत्त्वाचा विषय - डॉ. मोहन भागवत

नागपूर - काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे असो, वा राममंदिराचा प्रश्‍न असो; तो राजकीय विषय नसून, समाजाच्या सत्त्वाचा विषय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे विदर्भ प्रदेशाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रेशीमबागेत आयोजित प्रदेश अधिवेशनाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

विधिव्यवस्था ही युगानुकूल असायला हवी. जे कायदे काल चांगले होते ते आजही चांगलेच असण्याची शक्‍यता नसते, यामुळे काळानुरूप कायदे बदलायला हवेत असे सांगत, डॉ. मोहन भागवत यांनी वर्तमानस्थितीत मुस्लिम समुदायाकडून विरोध सुरू असलेल्या समान नागरी कायद्याचा पुनरुच्चार केला. डॉ. भागवत यांनी धर्म या शब्दाचा अर्थ पूजापाठ, कर्मकांड नसून, कर्तव्य असा असल्याचे सांगितले. ज्या आधारावर कायदा बनतो तो किती शाश्‍वत आहे याचा विचार व्हायला हवा असे म्हणत, वकिलांनी न्यायाचा धर्म स्वीकारून तात्कालिक प्रश्‍नांवर उत्तर शोधायला हवे, सोबतच शाश्‍वत सत्याची कधीही कास सोडू नये, असा उपदेश दिला.

सरकारी पदापासून दूर राहा
डॉ. भागवत यांनी अधिवक्ता परिषदेच्या कार्यकर्त्याने सरकारी पदापासून अलिप्त राहायला हवे असे सांगत, परिषदेत कार्यरत असूनही सरकारी वकिलांची पदे स्वीकारणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. राजकीय पक्षाचा आधार घेऊन परिषद प्रभाव निर्माण करू शकते. मात्र, तो आपला उद्देश नसून, सृष्टीच्या सत्याच्या आधारे धार्मिक समाजाची निर्मिती व्हायला हवी, असे डॉ. भागवत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com