वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याची भाषा करीत आहेत; पण त्यांच्यात पंतप्रधानपदासाठी स्पर्धा आहे. एका नावाविषयी त्यांच्यात एकवाक्यता होणे नाही. त्यामुळे मोदींना पर्याय नाही. अशा स्थितीत शरद पवार एनडीएत आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे आपल्या खास शैलीत उत्तर देत भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत 300 जागा मिळतील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज, शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, सुधाकर तायडे, दयाजी बहादुरे, चंद्रकांत पाटील, आर. एन. पाटील, केशव धाबर्डे, विदर्भ अध्यक्ष विजय आगलावे यांची उपस्थिती होती. श्री. आठवले म्हणाले, दलित पॅंथरच्या धर्तीवर देशात एक मजबूत संघटन असावे, याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींच्या मागे आम्ही उभे राहू. राफेल करारात भ्रष्टाचार झालेला नाही. मोदींची कारकीर्द भ्रष्टाचारमुक्त आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेने यावे, नाहीतर आम्ही भाजपसोबत जाऊ. शिवसेना सोबत आल्यास 45-46 जागा जिंकू. प्रकाश आंबेडकर व एमआयएम एकत्र आल्याचा फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाच बसेल. आम्हाला फायदाच होईल, असा दावाही त्यांनी केला.
राममंदिराबाबत बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय होईल, तो सर्वांनी मान्य करावा, असे मत व्यक्त केले. आरक्षण एकूण 75 टक्के करावे. वाढीव 25 टक्के आरक्षणात मराठा, ब्राह्मण, लिंगायत आदी समाजघटकांचा समावेश करावा, त्यासाठी कायदा करावा, असे सांगतानाच या विषयासह स्वतंत्र विदर्भाचा विषय एनडीएच्या आगामी बैठकीत मांडणार असल्याचे ते म्हणाले. पदोन्नतीत आरक्षणाविषयी कायदा करण्यास येत्या अधिवेशनात विधेयक आणण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या अभ्यासक्रमांना शासन मान्यता आहे, त्या सर्व अभ्यासक्रमांतील ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचेही आठवले म्हणाले.
कारण भाजप माझ्यासोबत
सर्व पुरोगामी पक्ष एकत्र येत असताना तुम्ही भाजपसोबत का आहात, या प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले, कारण भाजप माझ्यासोबत आहे. देवेंद्र फडणवीस सर्वांत चांगले मुख्यमंत्री आहेत, असे आपण म्हटले. त्यामागील कारण काय, असे विचारता ते मिश्कीलपणे म्हणाले, त्यांच्यात वाईट काहीच नाही म्हणून ते चांगले आहेत. संविधानाची उगाच कुणी चिंता करू नये. संविधान वाचविण्यास मोदी, आठवले समर्थ आहेत, असेही आठवले म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.