वर्धा : टिव्ही मालिका, चित्रपट यावर पुण्या-मुंबईकडील लोकांचे अधिराज्य समजले जाते. विदर्भातील लोकांना तिथे संधी नाही, असा सर्वसामान्य समज आहे. परंतु रसिका धामणकर यांनी तो समज पूर्णतः खोटा ठरवला. वर्धा जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेल्या रसिका यांनी मालिकांमधून घराघरांत पोहचल्या आहेत.
जिल्ह्यातील आर्वी पुलगांव मार्गावर असलेले रोहणा हे रसिकाचे मूळ गाव आहे. येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मध्यप्रदेशात त्यांनी शिक्षण घेतले आहे. मूळ विदर्भातील असलेल्या रसिका संगीत विशारद व इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रात सातत्याने काम करीत आहेत. रसिका धामणकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वाशीतील एका महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापक होत्या.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात त्या विशारद आहेत. लॉकडाऊनमधील अनुभव सांगताना रसिका म्हणाल्या, मी संगीत विशारद आहे. लॉकडाऊनदरम्यान मी गाण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे मला रियाझ करण्यास आणि संगीताचा अभ्यास करण्यास खूप वेळ मिळाला. महाविद्यालयात असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून माझ्या अभिनयाला पाठिंबा मिळाला. लॉकडाऊनच्या काळात मी ऑनलाईन क्लासेस घेतले.
एका मराठी वाहिनीवरील सुपरहिट मालिकेत नायकाच्या आईची भूमिका रसिका धामणकर यांच्या वाट्याला आली आहे. नागपंचमीच्या दिवशीपासून (25 जुलै) हा बदल प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ही मालिका पाहण्याची मजा काही वेगळीच असून, रसिकाच्या एन्ट्रीने ती आणखीच मजेदार होणार आहे.
लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने मालिकांचे शूटिंग बंद होते. यानंतर या मालिकेत रसिकाची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ही भूमिका इरावती लागू साकारत होत्या. कोवीडमुळे इरावती यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निर्माते व वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या जागी रसिका धामणकर व शेखर फडके यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांच्या भूमिका असलेले एपिसोड वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.