नागपूर - चितळ शिकारप्रकरणी भाजपचे नेते आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 मार्च 2016 रोजी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली गावात छापा टाकून चितळाचे चार किलो मांस आणि शस्त्रे जप्त केली होती. या प्रकरणी आनंदराव कचमा तोरेम (रा. दोडेपल्ली) याला अटक करण्यात आली. त्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांनी चितळाची शिकार केली आणि माझ्या बैलगाडीतून मांस आणून ते आपण कापत होतो, असे चौकशीदरम्यान वनाधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर उपविभागीय वनाधिकारी रवींद्र अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन ज्या ठिकाणी चितळाची शिकार करण्यात आली, त्या ठिकाणी पंचनामा केला व चितळ मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या काडतुसाचा शोध घेतला; परंतु ते मिळाले नाही. यानंतर उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी सर्च वॉरंट काढून आत्राम यांच्या निवासस्थानावर 8 मार्च 2016 रोजी दुपारी तीनला छापा टाकला होता.
|