अकरावीसाठी वीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

file photo
file photo

नागपूर : राज्याच्या शिक्षण विभागामार्फत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली. मात्र, दहा दिवसात केवळ 20 हजार 222 विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरला आहे. विशेष म्हणजे शाळांमध्येच शहरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावयाची होती. तसेच सीबीएसई, आयसीएसई आणि शहराबाहेरील विद्यार्थ्यांना 19 केंद्रातून माहितीपुस्तिकांची खरेदी आणि अर्जाचा पहिला भाग भरावयाचा होता.
बोर्डाच्या दहावीच्या निकालापूर्वीच दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी माहितीपुस्तिका खरेदी आणि अर्जाचा पहिला भाग भरण्याच्या सूचना देण्यात आल्यात. विशेष म्हणजे सीबीएसई दहावीचा निकालाची घोषणा 6 मे रोजी करण्यात आल्याने केंद्रीय प्रवेश समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी गर्दी करून अर्ज भरले. 8 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, अद्याप 20 हजार 222 विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन अर्जांची नोंदणी केल्याची माहिती समितीमार्फत देण्यात आली. मागील वर्षी ऑनलाइन अर्ज नोंदणी तीस दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. आता शहरासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थीही नोंदणीस सुरुवात करणार असल्याने पुन्हा गर्दी वाढेल अशी आशा केंद्रीय समितीकडून व्यक्त करण्यात आली.
रिक्त जागांची संख्या यंदाही वाढणार?
शहरातील 54 हजार 230 जागांसाठी मागील वर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यापैकी जवळपास 17 हजार 619 जागा रिक्त राहील्या होत्या. यात प्रामुख्याने कला, वाणिज्य आणि थोड्याफार द्विलक्षी, विज्ञान शाखेतील जागांचा समावेश होता. त्यामुळे नोंदणीला प्रतिसाद बघता, यावर्षीही रिक्त जागांची संख्या वाढणार की काय? अशी शंका महाविद्यालयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com