Amit Shah : शरद पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागावी - अमित शहा

भाजप नेते अमित शहा यांचा घणाघात, महायुतीची जाहीर सभा
sharad pawar should apologies to widow farmer amit shah criticism
sharad pawar should apologies to widow farmer amit shah criticismSakal

अमरावती : शरद पवार यांनी अमरावतीकरांची नाही तर विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागावी, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला.

यासोबतच राहुल गांधीचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न म्हणजे शेखचिल्लीचे स्वप्न आहे, अशी टीका केली. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी अमरावतीकर मतदारांनी कौल द्यावा, असे आवाहन केले.

महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ येथील सायन्सकोर मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार खासदार नवनीत राणा, जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण पोटे,

आमदार प्रताप अडसड, आमदार रवी राणा, भाजपचे नेते चैनसुख संचेती, मनसेचे विदर्भ संघटक पप्पू पाटील, पीरिपाचे चरणदास इंगोले, सागर महाराज, कारंजेकर महाराज, जनार्दन बोथे, शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार अभिजित अडसूळ, माजी आमदार रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या १८ मिनिटांच्या भाषणात अमित शहा यांनी मोदी सरकारने राबविलेल्या योजना व कामांची माहिती देतानाच शरद पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. सत्तर वर्षात जे काँग्रेस करू शकली नाही ते मोदी सरकारने पाच वर्षांत केले. कलम ३७०, ट्रीपल तलाक हटवून दाखवले.

सत्तर वर्ष कलम ३७० चा सांभाळ करणाऱ्या काँग्रेसने व राहुल गांधी यांनी कलम ३७० हटविल्यास देशात खून की नदीया बहेंगी, अशी टीका केली होती. गेल्या पाच वर्षांत एक दगडही भिरकावण्याचे धैर्य कुणी करू शकलेले नाही, ही मोदींची गॅरंटी आहे, असा घणाघात त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन चूक केली, त्यामुळे अमरावतीकरांची त्यांनी माफी मागितली. खरे तर शरद पवार यांनी त्यांच्या कृषिमंत्री व मुख्यमंत्रिपदाच्या काळात विदर्भातील सिंचनासाठी काहीच केले नाही.

त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागायला हवी. शिंदे-फडणवीस सरकारने विदर्भासाठी पैनगंगा-वैनगंगा जोडप्रकल्प मंजूर केला आहे. त्याचा लाभ विदर्भातील ७१ लाख हेक्टर क्षेत्राला मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आरक्षण जाईल ही अफवा

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आरक्षण जाईल, अशी अफवा काँग्रेस पसरवत आहे. मात्र न भाजप जाईल न आरक्षण हटवेल, ही मोदींची गॅरंटी आहे. बहूमताचा उपयोग आम्ही नेहमीच देशहिताच्या योजनांसाठी केला आहे, असे अमित शहा म्हणाले.

उमेश कोल्हे हत्याकांडाचा उल्लेख

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याकांडाचा उल्लेख करीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निष्क्रियतेचा परिचय देत हिंदुत्वावरील आघातावर पुन्हा आघात केला. ते बाळासाहेबांचे संस्कार विसरलेत.

आता राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. या राज्यात पुन्हा अशा हत्या करण्याचे धाडस कुणी करणार नाही, ही आमची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

- जाहीर सभा सकाळी ११ वाजता आयोजित होती. सभा दुपारी तीनला सुरू झाली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे दुपारी ४.०२ ला व्यासपीठावर आगमन झाले.

- अमित शहा यांनी १८ मिनिटे भाषण केले.

- भाषणातून त्यांनी कॉंग्रेससह राहुल गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

-भाषणाचा प्रारंभ त्यांनी उपस्थितांना मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचे की नाही, चारशे पार जायचे की नाही, नवनीत राणा यांना खासदार बनवायचे की नाही, अशा प्रश्नांनी केली.

- अधिकाधिक वेळ राष्ट्रीय मुद्द्यांवर व कॉंग्रेसवर टीका करण्यात वापरला.

- विदर्भ व स्थानिक मुद्द्यांना त्यांनी हलका हात घातला.

-उपस्थितांनी जय श्री रामाच्या नाऱ्यांनी सभास्थळ दणाणून सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com