चंद्रपूर : देश स्वातंत्र्य झाला. मात्र, हैदराबाद संस्थानातील राजुरा स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेतच होता. निजामांच्या जुलमी राजवटीच्या कथा कानावर येऊन धडकत होत्या. मन सुन्न होत होते. अशात भारतीय सैन्याने वर्धा नदीवरील रेल्वे पुलावरून चढाई केली. रजाकारांनी मला स्फोटकांनी उडवून टाकण्याची धमकी दिली. मात्र, वेळेपूर्वीच भारतीय सैन्याने माझा आधार घेत आगेकूच केली अन् रजाकारांना "सळोकी पळो' करून सोडले. स्वातंत्र्याचा आनंदोत्सव मी बघितला आहे. मी साक्षीदार आहे त्या लढाईचा..!
एका लढाईचा साक्षीदार असलेला दक्षिणेकडे जोडणाऱ्या वर्धानदीच्या पात्रातील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल राजुरा स्वातंत्र्याच्या लढाईतील सेतू ठरला होता. ऐतिहासिक महत्त्व असलेला हा रेल्वे पूल ताठ मानेने आजही उभा आहे. देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, हैदराबाद संस्थानात असलेल्या राजुरा तालुक्याला स्वातंत्र्य होण्यासाठी तब्बल तेरा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली.
निजामांच्या जुलमी राजवटीतून राजुरा क्षेत्र 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाले. मात्र, यासाठी भारतीय सैन्याने सर्वप्रथम दक्षिणेकडे जोडणाऱ्या वर्धानदीच्या पात्रातील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलावरून चढाई केली व रजाकारांना "सळो की पळो' करून सोडले. याच रेल्वे पुलाला स्फोटकांनी उडवून टाकण्याची योजना रझाकारांनी आखली.
मात्र, वेळेपूर्वीच भारतीय सैन्याने पुलावरून आगेकूच केली आणि रझाकारांना धडा शिकवला. स्वातंत्र्याची साक्ष देणारा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल अजूनही निजामशाहीच्या अस्ताची साक्ष देत समर्थपणे उभा आहे. जवळपास पाचशे मीटर लांब, 14 पिल्लर, नदीपात्रातून 23 ते 24 मीटर उंच हा पूल. अजूनही या पुलाच्या दोन्ही बाजूंनी कठडे नाहीत.
पुलाचे पिल्लर हे दगड आणि चुनखडीने बांधलेले आहेत. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही अनेक पूर, पाऊस, वादळ वारा सहन केलेला रेल्वेपूल भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण देतो व राजुरा मुक्तिसंग्रामाची गाथा सांगतो.
देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेस जवळपास 565 संस्थानांचे विलीनीकरण ही आधुनिक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना आहे. हैदराबाद, जुनागड व जम्मू-काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन होण्यासाठी अनुकूल नव्हती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. भारतात विलीनीकरणास नकार दिल्यानंतर निजामशाहीविरुद्ध भारतीय सैन्याने याच रेल्वे पुलावरून आगेकूच केली. त्यावेळी बल्लारपूर हे शेवटचे रेल्वेस्थानक होते.
वर्धा नदीच्या पलीकडे निजामाचे राज्य होते. वर्धा नदीच्या पुलावरून भारतीय सैनिक घुसणार असल्याची माहिती रजाकारांना मिळताच पूल उडविण्याचा बेत आखण्यात आला. पुलाखाली सुरुंग पेरून, हल्ला करून भारतीय सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियोजित वेळेत अगोदरच भारतीय सैन्याने पुलावरून एन्ट्री केली व रजाकारांना यमसदनी पाठवले. त्यानंतर राजुरा क्षेत्रात भारतीय सैन्याने प्रवेश करून निजामशाहीचा अस्त केला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.