Video : तीन हजार फुटांचे पत्र लिहिण्यास कारण की... 

file photo
file photo

पळसखेड (जि. अमरावती) : भारताचे प्रथम कृषिमंत्री डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती महोत्सवानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ जिल्ह्यातील नांदगाव हायस्कूल येथील 1500 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांत तीन हजार फुटांचे विक्रमी वाचण्यातून विचाराकडे, अशा आशयाचे दीर्घ पत्र लिहिले आहे. 

या पत्राचे प्रकाशन मंगळवारी (ता.24) श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्य सुहासिनी संजीव शेंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील दीनदलित, आर्थिक दुबळे, मागासवर्गीय, बहुजनांच्या विद्यार्थ्यांना सहजसुलभ शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने 1931 साली अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. आज ही संस्था रयत शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

नांदगाव हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रती असलेली श्रद्धा या दीर्घ पत्रातून व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मापासून तर त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, घटना समितीतील उल्लेखनीय कामगिरी, जागतिक पातळीवरील कृषी प्रदर्शनाचे आयोजन इत्यादींच्या बाबतीत विचार सादर केले आहेत. 

डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याची मागणी 
डॉ. पंजाबराव देशमुख सारख्या महान व उत्तुंग कर्तव्याची उंची असलेल्या व्यक्तीला देशातील सर्वोच्च असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. कृषिमहर्षी, शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे सर्व क्षेत्रातील कार्य महान असून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या दीर्घ पत्रातून व्यक्त केलेल्या भावना केंद्र सरकार दरबारी पोहोचविल्या जातील, असे संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी सांगितले. 

पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेतला असून याची शासनाने दखल घ्यावी, असे नांदगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुहासिनी संजीव शेंडे यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून भाऊसाहेब देशमुख सारख्या महापुरुषाला भारतरत्न मिळावा म्हणून मागणी करण्यात येत आहे, परंतु याची दखल घेतली गेली नाही. मात्र विद्यार्थ्यांनी आपली प्रांजळ व सुलभ भावना तिन्ही भाषांतून लिहून व्यक्त केली आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमांची केंद्र सरकारने निश्‍चितच दखल घ्यावी, असे आव्हान उपक्रमाच्या मुख्य शिक्षिका भारती बढे यांनी केले आहे. सदर दीर्घ पत्र तयार करण्यासाठी सुनीता वानखडे, भारती बढे, नमिता कराळे, संपदा देशमुख, महेंद्र इंगोले, जया देशमुख, अमोल ठाकरे, अजय बिसेन इत्यादींनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com