सामाजिक वनीकरणाचे दहा हजार वृक्ष बेपत्ता!

file photo
file photo

धाबा (चंद्रपूर): वृक्षारोपणाचे शासकीय आकडे कोटीच्या घरात आहेत. अशातच वृक्षारोपण केवळ आकड्यांचा खेळ असल्याची पोल खोल करणारा प्रकार मोंडपिपरी तालुक्‍यात समोर आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेली दहा हजार वृक्ष चक्क बेपत्ता झाली आहेत. त्यातही नवल असे बेपत्ता वृक्षांचा देखभालीसाठी पगारी मजूर आजही कार्यरत आहे.

राज्य शासनाच्या वनविभागाकडून 50 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय आहे. शासकीय कर्मचारी, सामाजिक संस्था वृक्षारोपणात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. मात्र यातील बहुतांश वृक्ष दुसऱ्यावर्षी दिसत नाही, अशी चर्चा आहे. याच चर्चेवर शिक्कामोर्तब करणारा प्रकार गोंडपिपरी तालुक्‍यात समोर आला आहे. वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याची जबाबदारी असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाचे दहा हजार वृक्ष बेपत्ता आहेत. सामाजिक वनीकरण विभाग, चंद्रपूरचा उपविभाग असलेल्या राजुरा विभागा अंतर्गत गोंडपिपरी तालुक्‍यातील धाबा, अमृतगुडा, टेकाभट्टी मार्गावर जानेवारी महिन्यात पाच ते सहा हजार वृक्षाची लागवड करण्यात आली.वेडगाव,सोनापूर,वामणपल्ली,लाठी मार्गावर पाच हजारांचा वर वृक्ष लावण्यात आले. वृक्षांचे खड्डे खोदण्यासाठी बाहेरून मजुर बोलविले होते. या दोन्ही मार्गावर दहा हजाराचावर वृक्ष लागवड फेब्रुवारी महीन्यात केली गेली. या वृक्षांना पाणी घालण्यासाठी अवघे दोन आठवडे दहा ते पंधरा मजूर लावल्या गेले. त्यानंतर मजूरांना बंद करण्यात आले. त्यानंतर वृक्षांच्या देखभालीसाठी दोन मजूरांची नेमणूक करण्यात आली. ज्या भागात वृक्ष लागवड झाली आहे. त्या भागात पाण्याची मोठी टंचाई असते. जिथे पिण्यालाच पाणी नाही. पाण्या अभावी झाडे करपली. झाडा सभोवताल कुंपण नसल्याने उरलीसुरली झाडे जनावरांनी फस्त केली. आजघडीला एक दोन करपलेली झाडे उभी आहेत.
वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची असते.मात्र अधिकाऱ्यांचा कामचुकारपणामुळे लाखो रुपये पाण्यात जात आहेत.


झाडे झुडपात उगवली !
धाबा-अमृतगुडा मार्गावर धाबा ग्रामपंचायतेने नुकतेच एक हजार आठसे वृक्षांची लागवड केली. याच मार्गावर सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड केली होती. विभागाने लावलेली झाडे कुठे आहेत ? असा प्रश्न मजूरांना केला असता झाडे झुडपांना झाकोळली आहे, असे सांगण्यात आले.

तीच जागा,तोच खड्डा अन तेच वृक्ष !
प्रत्येक ग्रामपंचायतीकडुन दरवर्षी वृक्षारोपणाचा " टार्गेट " पूर्ण केला जातो. रस्त्याच्या दूतर्फा तसेच पडीक जमीनीत ग्रामपंचायत वृक्ष लागवड करीत असते. गमतीची बाब अशी कि दरवर्षी तीच जागा,तोच खड्डा आणि तेच वृक्ष लावल्या जात आहे.मागिल चार वर्षात लावलेली झाडे वाचविण्यात ग्रामपंचायतेंना यश आलेले नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com