दहावीत पुन्हा मिळणार तोंडी परीक्षेचे गुण!

file photo
file photo

नागपूर  : दहावीच्या अभ्यासक्रमातून तोंडी परीक्षेचे गुण यावर्षीपासून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फटका दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना बसला. दहावीच्या निकालात राज्यात 12 टक्‍क्‍यांची घट दिसून आली. त्यामुळे शिक्षणमंत्री बदलताच, हा निर्णय मागे घेण्याचा दबाव वाढला. त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली. समितीकडूनही निर्णय मागे घेण्याबद्दल सकारात्मकता दर्शविण्यात आली असून शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनीही तोंडी परीक्षेचे गुण देणे परत सुरू करण्याचे आश्‍वासन भाजप शिक्षक आघाडीला दिले असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे पैकीच्या पैकी गुण मिळत असल्याने निकालाची आकडेवारी फुगत असल्याचा आरोप शिक्षणतज्ज्ञांकडून होऊ लागला. याच गुणांच्या भरोशावर गुणवत्ता नसलेले विद्यार्थी उत्तीर्ण होत असून कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांना त्याचा प्रवेशासाठी फायदा करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या वर्षी शिक्षण मंडळाकडून नववी आणि दहावीतील तोंडी परीक्षेचे गुण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी बारावीच्या परीक्षेत त्याची अंमलबजावणी करायची होती. मात्र, राज्यात दहावीच्या निकालात मोठी घट झाल्याचे चित्र निर्माण झाले. दहावीत एकीकडे बोर्डाकडून तोंडी परीक्षेचे गुण बंद करण्यात आले तर दुसरीकडे सीबीएसईने याच वर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे गुण देण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्य बोर्डाचा विद्यार्थी प्रवेशात मागे पडेल असा निष्कर्ष काढण्यात येऊ लागला. त्यातच निकाल पडल्याने या निष्कर्षाचा आधार घेत, विद्यार्थ्यांना परत गुण देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. या समितीकडून तोंडी परीक्षेचे गुण देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविण्यात आलेली आहे. दरम्यान, आज भाजपच्या शिक्षक आघाडीतर्फे शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनीही शिक्षक आघाडीला तोंडी परीक्षेचे गुण पुन्हा सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्याचे समजते. त्यामुळे येत्या वर्षापासून पुन्हा एकदा नववी आणि दहावीच्या परीक्षेत तोंडी परीक्षेचे वीस गुण देण्यास सुरुवात होईल यात शंका नाही. भाजप शिक्षक आघाडीच्या अध्यक्ष कल्पना पांडे यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री आशीष शेलार यांची भेट घेण्यात आली. त्यात त्यांनी नववी आणि दहावीमध्ये पूर्वीप्रमाणे तोंडी परीक्षा सुरू होईल असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे येत्या वर्षापासून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे गुण मिळणार आहेत.
- अनिल शिवणकर, विदर्भ सहसंयोजक, भाजप शिक्षक आघाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com