Video :'शकुंतले'वर काय हे दिवस आले... 

file photo
file photo

अचलपूर(अमरावती) : शकुंतलेची गोष्ट म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर लगेच उभी राहते कालिदासाने लिहिलेली दुष्यंताची शकुंतला पण ही गोष्ट त्या शकुंतलेची नाही. ही गोष्ट आहे अशा एका शकुंतलेची जी 1910 पासून अस्तित्वात आली आहे. ती म्हणजे पूर्वीची ब्रिटिशकालीन व आताची भारतीय शकुंतला रेल्वेची. हा एकच असा रेल्वे मार्ग आहे जो भारतीय रेल्वे महामंडळाच्या अधिपत्याखाली येत नाही. 1952 साली जेव्हा सर्व रेल्वे लाईन्सचे राष्ट्रीकरण झाले, तेव्हा शकुंतला रेल्वेचा यामध्ये समावेश का केला गेला नाही, याचे कारण समजायला मार्ग नाही.आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा बुलेट ट्रेन्स भारतामध्ये येत असतानाच शकुंतला रेल्वे हे जुन्या काळाचे चालते बोलते प्रतीक आहे. मात्र हे चालते बोलते प्रतीक मागील एक वर्षांपासून दुरुस्तीच्या नावावर बंद आहे.

ब्रिटिशकालीन रेल्वे दीड वर्षांपासून लॉकडाउन 

मागील दोन महिन्यांपासून कोविडच्या संकटामुळे सर्वच रेल्वे बंद होत्या. मात्र आता टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे मागील एक दीड वर्षांपासून लॉकडाउन असलेली शकुंतला कधी सुरू होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावरील 190 किलोमीटरचा प्रवास ताशी 20 किलोमीटरच्या गतीने शकुंतला पूर्ण करीत असते. यवतमाळ आणि अमरावती मधील गोरगरिबांची ही जीवनरेखा आहे. 1910 साली किलिक निक्‍सन या ब्रिटिश कंपनीने शकुंतला रेल्वेची स्थापना केली. ब्रिटिश सरकारच्या साहाय्याने त्यांनी सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी सुरू करून विदर्भामध्ये रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू केले. या रेल्वेमार्गाने कापसाची निर्यात करण्याचा त्यांचा मानस होता. 1916 साली हा रेल्वेमार्ग तयार झाला आणि त्यानंतर लवकरच मालवाहू ट्रेन्स बरोबरच प्रवासी ट्रेन्स ही या मार्गावर धावू लागल्या. या ट्रेनला नऊ स्टीम इंजिन असून ते 1921 साली मॅंचेस्टर येथे बनविले गेले होते. हे इंजिन 1923 साली रेल्वेच्या सेवेत रुजू झाले आणि तेव्हापासून तर 1994 पर्यंत हेच इंजिन होते. त्यानंतर 1994 मध्ये या ट्रेनला डिझेल इंजिन देण्यात आले. आज हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनच्या अधीन आहे. पण शकुंतला रेल्वेचा प्रवास आजही नॅरोगेजचा आहे आणि यवतमाळ ते अचलपूर प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला 20 तास लागतात. 

ब्रॉडगेजच्या आर्थिक तरतुदीला मान्यता 

तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या रेल्वेमार्गाचे रूपांतर ब्रॉडगेज मध्ये करण्यासाठी आर्थिक तरतुदीला मान्यता दिली होती. मात्र आता कोरोनाच्या संकटात सर्व कामे बंद होती. 


एक वर्षाच्या कार्यकाळात सर्वाधिक शकुंतला रेल्वेचा विषय हाती घेतला. ज्या स्थितीत शकुंतला रेल्वे बंद करण्यात आली, त्याच स्थितीत ती सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या लॉकडाउनचा काळ असल्याने शकुंतला बंद आहे. मात्र ही रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ती सुरू होईल. 
- नवनीत राणा, खासदार, अमरावती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com