निवडणुकीच्या रिंगणात पती, पत्नी आणि वहिणी; वैरागड येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्य

Three candidates from the same family are in the fray Gram panchayat election
Three candidates from the same family are in the fray Gram panchayat election

वैरागड (जि. गडचिरोली) : जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढत असताना अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्य निवडणूक लढविताना दिसत आहेत. वैरागड ग्रामपंचायतीतही असाच प्रकार झाला आहे. येथे एकाच कुटुंबातील तब्बल तीन सदस्य निवडणूक रिंगणात उतरल्याने निवडणुकीत जिल्हावासींचे लक्ष वेधून घेतले आहे.

वैरागड ग्रामपंचातीच्या १३ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. एकाच परिवारातील तीन उमेदवार उभे असल्याने ही घटना गावात चर्चेचा विषय ठरली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका संक्रांतीच्या दिवशी होत आहेत. आरमोरी तालुक्‍यातील वैरागड सर्वांत मोठी ग्रामपंचायत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीवर आपली सत्ता यावी, यासाठी कंबर कसली आहे.

प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्यावेळी या ग्रामपंचायतीत दोनच पॅनेल रिंगणात उभे राहून निवडणूक लढवत होते. त्यानंतर निवडणूक संपताच हेवेदावे, चुरस, चढाओढ, वाद हे सारे काही विसरून योग्य व्यक्तीला सरपंच बनविण्यासाठी मदत करीत होते. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय डावपेच लढवत बलराम सोमनानी यांनी त्यांची वहिनी गौरी सोमनानी यांना सरपंच बनविले.

यंदा १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातही बलराम सोमनानी यांनी आपले स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत ते स्वतः उभे आहेत. तसेच त्यांची पत्नी व वहिनीलाही त्यांनी निवडणुकीत उभे करून स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे आता एकाच सोमनानी कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात दिसून येत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय आगळीवेगळी ठरणार आहे.

मागच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यकाळ मे २०२० ला संपत असल्याने मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या. परंतु, देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने जवळपास नऊ महिने लॉकडाऊन पाळण्यात आला. लॉकडाऊन शिथिल झाल्याने आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. शुक्रवार (ता. १५) ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

चौकाचौकात रंगतेय चर्चा

गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. सगळेच उमेदवार गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचा आव आणत मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. त्यासोबतच कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे, कोण कसा आहे, कोण चांगला, कोण वाईट, कोण कोणत्या पक्षाचा, अशा एक ना अनेक चर्चा सध्या चौकाचौकात रंगत आहेत.

आपल्याच पॅनेलचा विजय होऊन आपल्या हातात कशी सत्ता येईल, यासाठी गावाचा सर्वांगीण विकास आपणच करू  शकतो, अशा प्रकारची वक्तव्ये उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी करत आहेत. त्यामुळे नेमका कोण खऱ्या अर्थाने गावाचा विकास करेल, यावरही ग्रामस्थ चावडीवर, चौकात आणि मिळेल त्या ठिकाणी चर्चा करताना दिसत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com