नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबता थांबत नाही आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रोज एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. यात शुक्रवारी तीन शेतकऱ्यांची भर पडली. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात तिघांनी मृत्यूला कवटाळले. सोबतच दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यालील महागाव तालुक्यातील काळी टेंभी येथील एका शेतकरीपुत्राने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सूरज शेषराव नरवाडे असे मृताचे नाव आहे. त्याच्या मागे घरात आई-वडील आहेत. सूरज याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती गावात कळताच समाजमन सुन्न झाले. सूरज हा महागाव येथील कृषी केंद्रात नोकरी करीत होता. नंतर तो एका खासगी कंपनीमध्ये कामाला लागला. सहा ते सात महिन्यांपासून तो कृषी संबंधित बि-बियाणे व औषधे विक्री करून उपजीविका करीत होता. त्याच्या कुटुंबात पाच एकर शेती आहे. मात्र, कोणतेही कारण नसताना अचानक त्याने जीवन का संपविले, हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
वर्धा जिल्ह्यातील बोटोना लगत धानोरा शिवारात शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. रवींद्र धनराज बागडे (वय ४५, रा. बोटोना) असे मृताचे नाव आहे. रवींद्र हे शेती करून उदरनिर्वाह चालवित होते. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. सतत तीन वर्षांपासून होणारी नापिकी तसेच यावर्षी गेलेले सोयाबीन यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. तर बोंडअळीमुळे कपाशीही सडली. यामुळे चिंतेत असलेल्या रवींद्रने पहाटे पाच वाजताच्या सुमारास घरून निघाला व धानोरा शिवारात सुधीर पाटील यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शेतमालक हे नेहमीप्रमाणे मजुरांकरिता विहिरीवर पाणी आणण्याकरिता गेले असता त्यांना शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश रामदास कोहळे असे मृताचे नाव आहे. तो रात्री परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो आढळून आला नाही. काल सकाळच्या सुमारास ममदापूर शेतशिवारातील एका शेतात नरेश पारधेकर यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नीलेश दिसून आला. नीलेश कोहळे हा विद्युत सहायक म्हणून कार्यरत होता. पुढील महिन्यात त्याचा विवाह होणार होता. परंतु, विवाहापूर्वी त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या चिमूर-वडाळा मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाकाडे कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक सहामधील साई डीजिटल बॅनर दुकानात अल्युमिनियमच्या ताराने स्लॅबच्या हुकाला लटकून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रोशन श्रीधर मोडक (वय २३, रा. चिमूर) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती पोलिसांना दिली असता सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील प्रभाग क्रमांक तेरामधील ४५ वर्षीय पुरुषाने घरीच गळफास लावून आत्महत्या केली. शंकर मडावी असे मृताचे नाव आहे. सदर प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना त्वरित मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्या केलेल्या शंकर मडावी यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा चुना विक्रीचा किरकोळ व्यवसाय होता. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.