वर्धा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या माहिती आहे का?

job
job

वर्धा : देशातील अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर पाणी फेरले. तत्कालीन भाजप सरकारने राज्यात 72 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासनही हवेत विरले आहे. लहान, मोठे उद्योग गुंडाळल्याने मागील काही वर्षांपासून रोजगार मिळणे अवघड झाले आहे. वर्धा जिल्ह्यात बोटावर मोजण्याऐवढ्या युवकांना नोकऱ्या मिळाल्या असून 77 हजार बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. याबाबतची नोंद जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे आहे.

मागील काही वर्षांपूर्वी रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी उमेदवारांची झुंबड उडत असे. तसेच सेवा योजना कार्यालयामार्फत नोंदणी करून बेरोजगार कार्ड प्राप्त व्हायचे. त्यावेळी अनेकांना नोकरीचे विविध ठिकाणचे कॉल्सही येते होते. परंतु, कालांतराने संगणकीकरण व ऑनलाइन प्रक्रियेमुळे सध्या सेवा योजना कार्यालयाचे कामकाज कालबाह्य झाल्याचे दिसून येते. आता विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय, निमशासकीय व अन्य संस्थांतील नोकरभरती परस्पर केली जाते. त्यामुळे रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे काम नाममात्र नोंदणीपुरते राहिल्याचे दिसून येते. रोजगार उपलब्ध करून देण्याचे कोणतेच काम नसल्याने 2015 पासून या कार्यालयाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र म्हणून नामाभिधान करण्यात आले आहे.

कौशल्यविकास रोजगार मार्गदर्शन केंद्रात 77 हजारांची नोंद
या कार्यालयात विविध सुशिक्षित बेरोजगारांनी वर्षनिहाय केलेली नोंदणी आणि मिळालेला रोजगार-2010-11 मध्ये नोंदणी 39 हजार 730 रोजगार उपलब्ध 4,164, 2011-12 नोंदणी 40 हजार 329 रोजगार 6,777, 2015-16 नोंदणी 56 हजार 64 रोजगार 1551 तर 2018-19 या वर्षांत 77 हजार 80 बेरोजगारांनी नोंदणी केली असून 2675 जणांना रोजगार मिळाला आहे. यावरून असे दिसते की, मागील दहा वर्षांची तुलना केली असता दिवसेंदिवस रोजगार, नोकरी मिळण्याचे प्रमाण घटले आहे.

यावर्षात 2675 जणांना मिळाली नोकरी
यावर्षी डिसेंबर अखेर नोंदणी झालेल्या 77 हजार 80 बेरोजगारांपैकी 47 हजार 918 पुरुष उमेदवारांची तर, 29 हजार 162 स्त्री उमेदवारांची नोंद झालेली आहे. त्यात ग्रामीण भागातील 45 हजार 161 बेरोजगारांचा समावेश आहे. त्यामध्ये 31 हजार 338 पुरुष तर 13 हजार 823 स्त्री उमेदवार आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील बेरोजगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामध्ये इयत्ता दहावीपेक्षा अधिक शिक्षण असलेल्या 62 हजार 351 बेरोजगारांनी नोंद केलेली आहे. तर या महिन्यात 624 जणांची नोंदणी झाली आहे.

या संकेतस्थळावर करा ऑनलाइन नोंदणी
सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. नोंदणी करण्यासाठी mahasawayam.gov.in
या संकेतस्थळावर जाऊन करता येईल. त्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आलेले आहे. आणि नोंदणी नंबर सदर उमेदवाराला ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीनिशी मिळतो.

कौशल्य विकास कार्यालयामार्फतच्या योजना
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सेवा सोसायटींना तीन लाखांपर्यंतची कामे विनानिविदा देणे, ग्रंथालय चालविणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज वाटप करणे व उमेदवारांची नोंदणी करणे, आदी कामे करण्यात येतात.

शैक्षणिक पात्रतानिहाय नोंदणीकृत उमेदवार
इयत्ता दहावी पास 21 हजार 650, बारावी पास 18 हजार 694, डिप्लोमासाठी इंजिनिअरिंग 1611, एज्युकेशन 893, इतर 2076, आयटीआय 3938, ऍपरेंटिक्‍स 601, तर पदवी घेतलेल्या आर्टस 5, 372, सायन्स 989, कॉमर्स 1,418, इंजिनिअरिंग 1,463, मेडीकल 37, ऍग्रिकल्चर 36, लॉ 18 व एज्युकेशन व मॅनेजमेंट 1552 व इतर अशा दहावीपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या एकूण 62 हजारांवर बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com