पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्याला समृद्धीचे वरदान लाभलेला वनवार्ला येथील पूस प्रकल्प गेल्या 28 वर्षांत 19 वेळा 'ओव्हरफ्लो' झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सोमवारी (ता.17) 'वसंतसागर' तुडुंब भरल्याने पोळा सणाच्या उत्सवावर शेतकरी आनंदित झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकार व दूरदृष्टीतून पूस प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाची पाणीपातळी 398.78 मीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 91.26 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. मंगळवारी धरण पूर्ण भरल्यानंतर दगडी भिंतीवरून 25 सेंटीमीटरचा ओव्हरफ्लो सुरू झाला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पूस प्रकल्पावर हौसी नागरिकांनी गर्दी केली आहे.
हा पूस प्रकल्प साधारणतः ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरलेला आहे. 1992 ते 2020 या कालखंडात प्रथमच जून महिन्यात 16 तारखेला 100 टक्के भरला, हे विशेष. जुलै महिन्यात 2003 व 2010 या दोन वर्षांत ओवरफ्लो झाला. तर 1995, 1996 व 2007मध्ये जुलै महिन्यात प्रकल्प तुडुंब भरला. पूस प्रकल्प 12 वर्षे ऑगस्ट महिन्यात भरलेला आहे. त्यात 1992, 94, 98, 99, 2001, 2002, 2005, 2006, 2011, 2012, 2016, 2018 या वर्षांचा समावेश आहे. साधारणतः ऑगस्टच्या मध्यात हा प्रकल्प ओसंडून वाहू लागतो, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पूस प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच 2004 या वर्षांत सर्वांत कमी जलसाठा 6.06 टक्के एवढा होता. 2017 मध्ये 23.87 टक्के एवढा, तर 2014 मध्ये 92.44 टक्के, 2015 मध्ये 66.81 व 2019 मध्ये 91.06 टक्के जलसाठा नोंदविण्यात आला आहे. यंदा धरण पूर्ण भरल्याने रब्बी व उन्हाळी पिकांसाठी सिंचन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अभियंता अविनाश भगत यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.