चंद्रपूर / वर्धा : गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने बुधवारी नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत हजेरी लावली. या दरम्यान वीज पडून अकरा जण ठार, तर चौदा जण झखमी झालेत. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून आठ ठार तर नऊ जण जखमी झाले.
वर्धा जिल्ह्यातील गिरड परिसरात जोरदार पावसासह गारपीटही झाली. तेथे वीज पडून एक जण ठार, तर पाच जखमी झालेत. गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातही प्रत्येकी एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा येथील शेतशिवारात रोवणी सुरू असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास वीज कोसळली. यात अर्चना मडावी (वय २७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
खुशाल ठाकरे (३०), रेखा सोनटक्के (४५), सुनंदा इंगोले (४६), राधिका भंडारे (२०), वर्षा सोयाम (४०), रेखा कुळमेथे(५५) हे सहा जण यावेळी जखमी झाले. यापैकी खुशाल ठाकरे याची प्रकृती चिंताजनक आहे.
ब्रह्मपुरीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटाळा येथील महिला धानरोवणी आटोपून गावाकडे परत येत असतानाच पावसाला सुरुवात झाली. तेव्हाच अचानक वीज पडली. यात गीता ढोंगे (४५) या महिलेचा मृत्यू झाला.
सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथी शेतात काम करणाऱ्या महिलांवर वीज कोसळली. त्यात कल्पना झोडे (४०), अंजना (५०) या दोन महिलांचा मृत्यू झाला; तर, सुनीता आनंदे ही जखमी झाली. गोंडपिंपरी तालुक्यातील चिंवडा येथील वनमजूर गोविंदा टेकाम हा जंगलात काम करीत असताना त्याच्यावर वीज कोसळली.
त्यात त्याचा मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील खैरगाव येथे शेतात वीज पडून फवारणी करीत असणाऱ्या पुरुषोत्तम परचाके (वय २५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नागभीड तालुक्यातील नांदेड येथील शेतात रोवणी सुरू असताना वीज कोसळून शोफिया शेख (१७), महेशा शेख (१६) या दोन तरुणी जखमी झाल्या.
अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) ः तालुक्यात बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या पावसादरम्यान बोळदे/करड येथील शेतात दुपारी वीज पडून रोहिदास हुमणे (५३, रा. बोळदे) याचा मृत्यू झाला.
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे बुधवारी सकाळी शेतीच्या कामावर गेलेल्या लक्ष्मण रामटेके (५४)या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. बुधवारी सकाळी तालुक्यातील अहेरी, महागाव, चेरपल्ली, वांगेपल्ली, नागेपल्ली, आलापल्ली, पुसुकपल्ली आदी गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला.
गिरड (जि. वर्धा) ः समुद्रपूर तालुक्यातील गिरड परीसरात आज बुधवारी दुपारी मुसळधार पावसासह गारपीट झाली व त्यादरम्यान वीज कोसळून गिरड गावात रोहित्राजवळ उभ्या असलेल्या महिलांपैकी दुर्गा जांभुळे (४६) ही महिला ठार झाली, तर ममता कटमुसरे, कल्पना कटमुसरे, वंदना जांभुळे, चंद्रकला जांभुळे, शारदा जांभुळे या पाच महिला जखमी झाल्यात.
ढगफुटीसदृश पाऊस व गारपीट
वर्धा जिल्ह्यातील गिरड परीसरातल्या (ता. समुद्रपूर) पाच गावांत विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला व त्यासोबतच गाराही पडल्या. गिरड भागातील शिवणफळ, जोगीणगुंफा, उंदीरगाव, पिपरी, मोहगाव, तावी, आर्वी, फरीदपूर या गावांत हा पाऊस व गारपीट झाली. साधारणतः बोरांच्या आकारांच्या गारा पडल्या. गारांचा मारा विरळ असल्याने शेतपिकांची नुकसान झाल्याची बातमी आली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.